नांदेड : नांदेड शहराचा विस्तार वाढत आहे, लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे त्यातुलनेत वाहनांची संख्याही अधिक झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या तीव्र समस्यांने सर्व सामान्यांचा जिव मेटाकुटीला आला आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसही गेल्या आठ दिवसांपासून ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत.
आठ दिवसांमध्ये 1383 वाहने, हातगाडे, फळगाडे, अतिक्रमण तसेच विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली आहे. ही कारवाई आणखी तीव्र केल्याशिवाय शहरातील बेशिस्त वाहतूकीचा प्रश्न सुटणार नाही.
शहरातील प्रमुख रस्त्यांवरून वाहन चालवणे तर सोडाच, पण साधे पायी चालणेही आता जिवावर बेतू लागले आहे. वाढते अतिक्रमण आणि वाहतुकीच्या नियमांचा फज्जा उडाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठा आणि रस्ते आता अरुंद वाटू लागले आहेत.
याचे मुख्य कारण म्हणजे रस्त्यांच्या दुतर्फा असलेले हातगाडे, फळ विक्रेते आणि दुकानांचे वाढीव अतिक्रमण. अनेक दुकानदारांनी आपल्या प्रतिष्ठानांचे जाहिरात फलक थेट रस्त्यावर लावल्याने पादचाऱ्यांसाठी असलेली जागा पूर्णतः संपली आहे. परिणामी, पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून भररस्त्यातून चालावे लागत आहे.
केवळ अतिक्रमणच नाही, तर वाहनचालकांची बेशिस्तही या कोंडीला तितकीच कारणीभूत आहे. रस्त्यावर कुठेही वाकडी-तिकडी उभी केलेली वाहने,नियमबाह्य वाहन चालवणे: ट्रीपल सीट दुचाकी आणि सुसाट वेगाने धावणारी चारचाकी वाहने. ध्वनी प्रदूषण: सायलेन्सरमध्ये बदल करून फटाका फोडणाऱ्या बुलेटस्वारांनी अनेकांना याचा त्रास होतो, शहरातील खालील भागांत वाहतूक कोंडीचे प्रमाण सर्वाधिक असून येथे तासन्तास वाहने अडकून पडत आहेत.
गेल्या दोन फेब्रुवारी रोजी वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या टिमने 201 वाहनांवर कारवाई केली. तसेच चार फेब्रुवारी रोजी 149, पाच फेब्रुवारी रोजी 206, सहा फेब्रुवारी रोजी 373, सात फेब्रुवारी रोजी 322 व आठ फेब्रुवारी रोजी 132 असे एकूण 1383 वाहनांवर मुख्यतः महावीर चौक, वजिराबाद, शिवाजी पुतळा, शिवाजीनगर, कलामंदिर, राज कॉर्नर, तरोडा नाका, छत्रपती चौक आणि श्रीनगर या मार्गावरील वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक नियमांचे पालन करावे
वाढत्या तक्रारींची दखल घेत नांदेड वाहतूक पोलिसांनी गेल्या आठ दिवसांपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलीस प्रशासनाने धडक कारवाई करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक बडगा उगारला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार व अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांनी ही मोहीम पुढेही सुरूच राहील असे सांगितले आहे, शिवाय नियमांचे उल्लंघन कुणीही करू नये व वाहतूक नियमांचे पालन करावे असे अवाहन केले आहे.