Nanded Sugarcane 10 percent weight loss
संघपाल वाघमारे
कंधार : पुढारी वृत्तसेवा : नगदी पीक म्हणून शेकऱ्याची ऊसाला पसंती आहे. ज्यांच्याकडे बारामाही पाणी आहे असे शेतकरी ऊसाला प्राधान्य देतात. रात्री अपरात्री लाईटच्या लहरीपणामुळे शेतकरी जीव धोक्यात घालून ऊसाचे पीक घेतात, पण कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे शेतकऱ्याच्या हाती नुकसान ठरलेले आहे. आता ऊसतोडीच्या आधीच तुरे फुटल्याने वजनात दहा टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
कंधार तालुक्यात मानार प्रकल्पाच्या सिंचनाखाली येणारे क्षेत्र आणि तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने ओलिताखाली येत असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात ऊसाची झालेली आहे. मागील दोन वर्षांपासून सरासरी पेक्षा जास्त पडलेल्या पावसाने साहजिकच ऊसाचे क्षेत्र वाढलेले आहे.
मानार प्रकल्पला दोन कालवे आहेत. डावा कालवा ६८ किलोमीटरचा आहे तर उजवा कालवा २२ किलोमीटरचा. या कालव्यातून कंधार, नायगाव, बिलोली या तालुक्यातील शेतीसाठी, जनावरासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जातो. बाचोटी, चिंचोली, मानसपुरी, बारूल, कौठा या गावांच्या ऊसाना तुरे फुटले आहेत. या वर्षी उसाचे पीक जोमदार आलेले असताना दिवस आणि रात्रीच्या वातावरणातील बदल आणि अतिवृष्टी याच बरोबरचा हवेतील आर्द्रता, सततचा पाऊस, जमिनीत पाणी साचणे, जमिनीतील नत्राची कमतरता आणि चुकीचा लागवडीचा हंगाम याचा फटका ऊसाला बसला आहे. आता उसाला तुरे आल्याने ऊस आतून पोकळ होऊन वजन घटू लागले आहे. त्यामुळे वजनात सुमारे १० टक्के पर्यंत घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
साखरेचा उतारा कमी येण्याची शक्यता
हवामानः तापमान आणि हवेतील आर्द्रतेतील बदल, सततचा पाऊस आणि जमिनीत जास्त काळ पाणी साचून राहणे. तसेच उसाच्या पीक वाढीच्या टप्प्यावर तुरा येण्याची शक्यता जास्त असते. जमिनीतील नत्राची कमतरता. खोडवा उसाला तुरा येण्याचे प्रमाण हे नवीन लागवड केलेल्या उसापेक्षा जास्त असते.
तुरा आल्या नंतर ऊस पोकळ होतो. उसातील साखर विघटित होते आणि ग्लुकोज व फ्रुक्टोज मध्ये रूपांतर होत असल्याने साखर उतारा कमी होतो. या वर्षीं सप्टेंबरमध्ये पडलेला पाऊस आणि तापमानातील १० अंश सेल्सिअस पर्यंतची घटमुळे उसाला तुरे फुटले आहेत. त्यामुळे ऊसाचे वजन घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.