नांदेड : जिल्ह्यातील गौण खनिज उत्खनन, अवैध उत्खनन तसेच शासनाच्या महसुलाशी संबंधित बार्बीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हा गौण खनिज विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सामान्य नागरिकांना घरकुल बांधकामासाठी आवश्यक असलेली वाळू वेळेवर व परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी केली.
घरकुल हे प्रत्येक सामान्य माणसाचे स्वतःच्या हक्काचे घर असावे, हे त्याचे आयुष्यभराचे स्वप्न असते. शासनाच्या विविध घरकुल योजनांमधून जिल्ह्यात मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहेत. मात्र, घरकुल बांधकामासाठी आवश्यक असलेली वाळू वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे केवळ वाळूअभावी सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न अपूर्ण राहू नये, यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, असे खासदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.
बैठकीत खासदार चव्हाण यांनी प्रशासनाकडून घरकुल योजनेअंतर्गत आतापर्यंत किती लाभार्थ्यांची नोंदणी व मंजुरी झाली आहे, त्यापैकी किती लाभार्थ्यांनी वाळूसाठी मागणी अथवा नोंदणी केली आहे आणि प्रत्यक्षात किती लाभार्थ्यांना प्रशासनामार्फत वाळू उपलब्ध करून देण्यात आली आहे, याची तालुकानिहाय माहिती मागितली. घरकुलासाठी स्वतंत्र कोटा ठेवण्याची मागणीघरकुल लाभार्थ्यांना प्राधान्याने आणि पारदर्शक पद्धतीने वाळू उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा किंवा निश्चित कोटा ठेवण्यात आला आहे का, याची माहिती घेऊन आवश्यक असल्यास त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी खासदारांनी केली.
घरकुल मंजूर झालेले असताना वाळू मिळत नसल्याने लाभार्थ्यांना बांधकाम सुरू करता येत नाही. त्यामुळे प्रलंबित घरकुल लाभार्थ्यांना ठराविक कालमर्यादेत वाळू उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशवजा आवाहन खासदार चव्हाण यांनी प्रशासनाला केले.
दरम्यान, अवैध उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडण्याबरोबरच पर्यावरण, रस्ते, शेती आणि सार्वजनिक निसर्गसंपत्तीचे नुकसान होत असल्याने अशा प्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदारांनी केली. केवळ कागदोपत्री कारवाई न करता संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करणे, वाहन तपासणी करणे, उत्खननाचे प्रमाण आणि शासनाला मिळणारा महसूल याची नियमित तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. या आढावा बैठकीत खा. अशोक चव्हाण, खा. अजित गोपछडे, आ. प्रताप पाटील, आ. बालाजी कल्याणकर, आ. आनंद बोंढारकर यांनीही विविध मुद्दे उपस्थित केले.
शाळांच्या दुरवस्थेकडेही तातडीने लक्ष द्या
बैठकीत जिल्ह्यातील शाळांच्या दुरवस्थेचा मुद्दाही खासदार चव्हाण यांनी उपस्थित केला. अनेक शाळांच्या इमारती जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे छत, भिंती, फरशी, दरवाजे-खिडक्या यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ व स्वतंत्र शौचालये, नियमित पाणीपुरवठा, स्वच्छता व सॅनिटरी सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली. ग्रामीण भागातील शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असल्यास ठज/शुद्धीकरण यंत्रणा तसेच आवश्यक पाईपलाईन उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.