Nanded news 
नांदेड

marathwada flood news: पूराचा फटका: मन्याड नदीत विद्युत पोल वाकल्याने ४० ते ५० गावांचा विद्युत पुरवठा बंद

Nanded electricity supply disrupted: शेतकऱ्यांचा मोडला कणा, देवा आता तरी पावसाला थांब म्हणा...; शेतकऱ्यांचा टाहो

पुढारी वृत्तसेवा

धोंडीबा बोरगावे

फुलवळ: यंदा पावसाने सर्वत्र चांगलाच कहर केला असल्याने खरिपाच्या शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुले शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे तर केलेली मेहनत व खर्च मातीमोल झालंय, म्हटलं तरी वावगं ठरणार नाही .

गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मन्याड नदीत विद्युत पोल वाकल्याने कंधारवरून फुलवळच्या ३३ के.व्ही. उपकेंद्राला येणारा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे फुलवळ उपकेंद्रासह पेठवडज व दिग्रस सबस्टेशन अंतर्गत जवळपास ४० ते ५० गावांचा कालपासून विद्युत पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन बसले आहे. म्हणूनच प्रत्येकाच्या प्रतिक्रियेतून एवढंच ऐकायला मिळते आहे की... 'देवा पावसाला आता थांब म्हणा कारण शेतकऱ्यांचा मोडलाय हो कणा..'

गेली काही दिवसांपासून पावसाची सतत धार चालू असून अधून मधून अतिवृष्टीसदृश्य परिस्थिती निर्माण करणारा पाऊस कहर करतोय. त्यामुळे खरिपाच्या पेरणीपासूनच शेतकऱ्यांच्या पाठीमागे शुक्लकाष्ठ लागले की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. एकदाची पेरणी करून मोकळा झालेल्या बळीराजाला त्या पिकाचे उत्पन्न पदरी पडण्याअगोरदरच बेरीज वजाबाकीचे गणितं मांडून आपला जीवनगाडा व संसार कसा सुखाचा होईल? याची आकडेमोड करण्याची बळीराजाची सवयच आहे.

यंदाही तसेच काहीसे स्वप्न उराशी बाळगून आलेला दिवस पुढे ढकलताना ऐन हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून घेतला. त्यामुळे आपला कधीच न संपणारा जीवन संघर्ष कधी थांबेल या आशेने शेवटी देवाकडेच विनवणी करतोय की, देवा आतातरी पावसाला थांब म्हणा...कारण आम्हा शेतकऱ्यांचा मोडलाय हो कणा..., अशी आर्त टाहो फोडतो आहे.

उभ्या सोयाबीन ला जागेवरच कोंब फुटायला सुरुवात झाली असून कापूस , ऊस , ज्वारी , तूर आडवी होऊन लोळण घालते आहे . तेंव्हा ज्याच्या जीवावर आम्ही शेतकरी राबराब राबतो आणि निसर्गाशी जुगार लावतो व नशीब आजमावतो. पण या सट्टेबाजीत गेली काही वर्षांपासून आम्ही नेहमीच हरतोय , यंदातरी नशीब उजडेल अशी आशा होती परंतु आता तीही मावळल्यागत झाली आहे अशी चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी ने तर चक्क जीवनमान च उध्वस्त केले म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी ने शेतीचे , शेतीपिकांचे तर अतोनात नुकसान केलेच आहे परंतु नद्या , नाल्यांना आलेल्या पुरामुळे चक्क जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. कंधार तालुक्यातील मन्याड नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे कंधार ते मुखेड व कंधार ते जांब या मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. तर फुलवळ , कंधारेवाडी या गावातील पुलावरून पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने गेल्या काही दिवसांत अनेकवेळा गावाचा संपर्क तुटला तर अनेक ठिकाणी खड्डेमय रस्ते असल्याने वाहतुकीला चांगलीच खीळ बसली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT