नायगाव : पंचायत समितीअंतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरांचे फोटो घेऊन ते ऑनलाइन अपलोड करण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित अभियंत्यांच्या कथित दिरंगाईमुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार संपर्क साधूनही कामे होत नसल्याने लाभार्थ्यांना पंचायत समितीच्या उंबरठ्यावर हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.
लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, घरांचे फोटो घेणे व ते ऑनलाइन प्रणालीवर अपलोड करणे ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अनेकांचे शासकीय लाभ रखडले आहेत. काही लाभार्थ्यांच्या घरी अद्याप भेट देण्यात आलेली नाही, तर काहींचे फोटो घेऊनही ते ऑनलाइन अपलोड करण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिणामी, योजनांचा लाभ मिळण्यात विलंब होत असून लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास मोबाईल बहुतांश वेळा बंद असल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे. फोन लागल्यास तो दुसऱ्याच व्यक्तीकडून उचलला जात असून, "साहेब फिल्डवर आहेत", "मोबाईल माझ्याकडे राहिला आहे" किंवा "कार्यालयात गेले असून मोबाईल विसरले आहेत" अशी उत्तरे मिळत असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात अनेक वेळा गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील व कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रम व नाराजी वाढत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांनंतरही कामे होत नसतील तर संबंधित यंत्रणेवर कोणाचा वचक आहे, असा सवाल लाभार्थी उपस्थित करीत आहेत. शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेमध्येच असा ढिसाळपणा दिसून येत असल्याने पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, लाभार्थ्यांची गैरसोय तातडीने दूर करून प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.