Nanded News: Suspicion over arrest of fertilizer auto going to Telangana and release
राजेंद्र कांबळे
बिलोली : बिलोली शहरातील एका कृषी सेवा केंद्रातून जास्त दराने रासायनिक खताची विक्री करून ते अवैधरित्या तेलंगणा राज्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी पाठविल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवार (दि. ४ ऑगस्ट) रोजी कार्ला (तेलंगणा सीमेजवळ) येथे एका ऑटोवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ऑटो ताब्यात घेतल्यानंतर काही वेळातच तो सोडून देण्यात आल्याने या कारवाईबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चाना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ऑटोमध्ये डीएपी व 18-18-10 खताची पोती भरलेली होती. सदर खत बिलोली येथील कृषी सेवा केंद्रातून तेलंगणातील बाजारपेठेत विक्रीसाठी नेले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कृषी अधिकाऱ्यांनी वाहन अडवून त्याची पाहणी केली. या घटनेची माहिती परिसरात पसरताच अनेक नागरिक घटनास्थळी जमा झाले.
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, वाहन अडवल्यानंतर संबंधित कृषी सेवा केंद्राच्या चालकासोबत दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर काही वेळातच कोणतीही पुढील कारवाई न करता ऑटो सोडून देण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सुरुवातीला कारवाई करून नंतर वाहन का सोडण्यात आले, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असली तरी या दाव्याची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कोणाच्या आदेशाने वाहन सोडले
संबंधित खताचा ऑटो सोडताना कृषी विभागाने साध्या कागदावर पंचनामा केल्याचे समोर आले असून त्याची प्रतही उपलब्ध झाली आहे. या पंचनाम्यात विभागाचे लेटरहेड, प्रकरण क्रमांक किंवा इतर अधिकृत नोंदी नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने हा पंचनामा शासकीय नियमानुसार अधिकृत स्वरूपाचा आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर वाहनावरील कारवाई अधिकृत होती, तर ती विभागाच्या नियमानुसार नोंदवहीत नोंदविण्यात आली का ? वाहन सोडण्याचे लेखी आदेश कोणत्या अधिकाऱ्याने दिले ? तसेच जप्ती अथवा तपासणीचा अधिकृत अहवाल तयार करण्यात आला का ? याबाबत कृषी विभागाने खुलासा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.