हिमायतनगर : शहरापासून आयटीआय मार्गे सिरंजनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठ्या भगदाडामुळे अपघाताची मालिका सुरूच आहे. उन्हाळ्यात याच खड्ड्यामुळे ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता. या गंभीर घटनेनंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही. आता पावसाळ्यामुळे हा खड्डा अधिकच मोठा झाला असून, शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती न केल्यास विद्यार्थ्यांची बस वाहतूक बंद करावी लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
सध्या शाळा सुरू झाल्या असून सिरंजनी, एकंबा, सेलोडा आणि कौठा या गावांतील जवळपास शंभर विद्यार्थिनी शालेय शिक्षणासाठी दररोज 'मानव विकास'च्या बसने हिमायतनगर शहरात येतात. नुकतीच या विद्यार्थिनींना घेऊन जाणारी बस आयटीआय ते सिरंजनी रस्त्यावरील या मोठ्या खड्ड्यामुळे अचानक रस्त्याखाली उतरली. मात्र, बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधान आणि दक्षतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
या धोकादायक रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार कळवूनही अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. दररोज शेकडो विद्यार्थिनींना याच खिळखिळ्या आणि जीवघेण्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पालकांनी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास शक्य नाही "सिरंजनी, एकंबा, कोठा, सेलोडा गावांतील सुमारे १०० विद्यार्थिनी शालेय शिक्षणासाठी या बसने प्रवास करतात. आयटीआय ते सिरंजनी रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून मानव विकास बस चालवणे आता शक्य नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर करावा, अन्यथा ही बस सेवा बंद करावी लागेल."— दत्तात्रय दळवे (वाहतूक नियंत्रक, मानव विकास बस, हिमायतनगर)