Naigaon Lok Adalat
नायगाव : नायगाव येथील राष्ट्रीय लोकअदालतीत विविध न्यायालयीन प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात येत सामाजिक सलोखा आणि जलद न्यायनिवाड्याचा आदर्श निर्माण करण्यात आला. या लोकअदालतीत तब्बल ४२ दिवाणी व फौजदारी स्वरूपाची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. विशेष म्हणजे, कौटुंबिक वादातील एका प्रकरणात पती-पत्नीमध्ये समेट घडून आल्याने विस्कटलेला संसार पुन्हा फुलल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळाले.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश नरेंद्र के. ब्रह्मे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. जी. देशपांडे तसेच तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती ई. टी. गिते यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
या लोकअदालतीत दाखलपूर्व ३०७१ नोटिसांवर सुनावणी घेण्यात आली. त्यापैकी ११ प्रकरणांमध्ये सामोपचाराने तोडगा काढण्यात आला असून ३५ लाख ८७ हजार ५०० रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच गुन्हा कबुलीच्या २१ प्रकरणांमधून ४ हजार २०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.
विशेष लक्षवेधी ठरलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या एका प्रकरणात दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणण्यात यश आले. न्यायालयीन वादाच्या उंबरठ्यावर आलेले पती-पत्नी पुन्हा एकत्र येऊन नव्याने संसार सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा श्रीमती ई. टी. गिते यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश नरेंद्र के. ब्रह्मे आणि सचिव एस. जी. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रभावीपणे पार पडला.
पॅनल विधीज्ञ म्हणून ॲड. डी. बी. मोरे यांनी काम पाहिले. तसेच तालुका वकील संघाचे ॲड. एल. एस. तुमेदवार, ॲड. एस. बी. कदम यांच्यासह अनेक विधीज्ञांनी सक्रिय सहभाग नोंदवत लोकअदालतीच्या यशात मोलाची भूमिका बजावली.