काँग्रेस-वंचित आघाडीची आज खंडपीठात याचिका pudhari photo
नांदेड

Nanded News : काँग्रेस-वंचित आघाडीची आज खंडपीठात याचिका

महापौरांच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : नांदेड महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापर्यंत गेला आहे. महापौर कविता मुळे यांनी घेतलेल्या निर्णयाला आव्हान देण्याची कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाली असून खंडपीठात उद्या बुधवारी याचिका दाखल होणार असल्याची माहिती काँग्रेस-वंचित आघाडीचे गटनेते प्रशांत इंगोले यांनी दिली.

सोमवारी महानगरपालिकेत घडलेल्या नाट्यमय घडामोडीत महापौर कविता मुळे यांनी एमआयएमचे मसूद अहमद खान यांना विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीचे पत्र दिल्यामुळे काँग्रेस-वंचित आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या आघाडीचे 15 नगरसेवक असतानाही महापौरांनी 14 नगरसेवक असलेल्या एमआयएमच्या पारड्यात विरोधी पक्षनेतेपद टाकल्यामुळे संतापलेल्या आघाडीच्या नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी सुरु केली.

आघाडीचे गटनेते प्रशांत इंगोले यांच्यासह काही नगरसेवकांनी मंगळवारी खंडपीठात जावून विधिज्ञांचा सल्ला घेतला. कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर बुधवारी न्यायालयात याचिका दाखल होईल, असे इंगोले यांनी सांगितले. महापौर कविता मुळे यांनी अचानक आणि तडकफडकी घेतलेल्या निर्णयावर आघाडीच्या नेत्यांनी संशय व्यक्त केला असून आघाडीच्या नेत्यांची बाजू ऐकून न घेता अथवा चर्चा न करता घाईघाईने निर्णय घेण्याची गरज का पडली? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

एमआयएम ही भाजपाची ‌‘बी टीम‌’ असल्याचा आरोप निवडणुकी-पासूनच केला जात आहे. काँग्रेस-वंजित आघाडीला मनपाच्या सर्व प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यासाठीच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी विरोधी पक्षनेतेपद एमआयएमच्या झोळीत टाकले असावा, असाही कयास बांधला जात आहे. मनपात सक्षम विरोधी पक्ष असणे गरजेचे असून भाजपा आणि एमआयएम एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे एमआयएम सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू शकणार नाही, असे काँग्रेसच्या नेत्यांचे ठाम मत आहे. या निवडीला तात्काळ स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल केली जाणार आहे.

काँग्रेसमध्येच समन्वय नाही

दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कुठलाही समन्वय नसल्याची नामी संधी भाजपाला मिळत असल्याचे दिसत आहे. जिल्हा पक्ष कार्यालय गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याची माहिती असून जिल्हाध्यक्षांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही कार्यालयाकडे पाठ फिरवल्याचे सांगण्यात येते. एकीकडे तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या दणदणीत विजयाचा नांदेडमध्ये जल्लोष सुरु असताना केरळमध्ये काँग्रेसला मिळालेल्या यशाचा जल्लोष नव्हे तर साधा आनंद व्यक्त करण्याचे भानही पदाधिकाऱ्यांनी ठेवले नसल्याची खंत सामान्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मनपा निवडणुकीतील अपयश, स्वीकृत सदस्य निवडीत गोंधळ आणि आता विरोधी पक्षनेतेपदी निसटले. याचे कोणालाच ना सोयर ना सुतक, अशा दयनिय अवस्थेचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT