नांदेड: मागील तीन महिन्यांपासूनचे प्रलंबित प्रस्ताव चर्चेला न घेता महापौर कविता मुळे यांनी विषय पत्रिकेवरील भाजप-एमआयएमचे प्रस्ताव रेटून धरल्यामुळे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेत प्रलंबित प्रस्तावावर चर्चेची मागणी लावून धरली. यावेळी सतंप्त नगरसेवकांनी कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभागृहात प्रचंड गोंंधळ उडाला. या गोंधळातच विषय पत्रिकेवरील 8 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सत्ताधार्यांच्या या मुस्कटदाबीच्या निषेधार्थ काँग्रेस-वंचित आघाडीच्या नगरसेवकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत सभात्याग केला.
गेल्या 8 जुलै रोजी होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी बोलावण्यात आली होती. प्रशासकीय इमारतीतील कै.शंकररावजी चव्हाण सभागृहात सकाळी सभा सुरू होताच काँग्रेस-वंचित आघाडीच्या नगरसेवकांनी मागील तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी केली. परंतु महापौर कविता मुळे यांनी आजच्या विषय पत्रिकेवरील प्रस्ताव वाचून दाखवण्यास सुरुवात केली.
या प्रस्तावावर आधी चर्चा केल्यानंतर मागील प्रस्तावावर चर्चा सुरू केली जाईल, असे महापौरांनी जाहीर केले. परंतु प्रभागातील विकास कामे ठप्प असल्याने मागील प्रस्ताव महत्त्वाचे असल्याचे काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. शिवाय सभेपूर्वी झालेल्या बैठकीत तसे आश्वासनही दिल्याचे महापौरांच्या लक्षात आणून दिले. परंतु त्याची कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेस नगरसेवकांनी गोंधळ घातला.
आतापर्यंत महापालिकेच्या तीन सर्वसाधारण सभा झाल्या आहेत. काँग्रेस आणि वंचित आघाडीचे 40 प्रस्ताव प्रलंबित असून यापैकी एकाही प्रस्तावर चर्चा झालेली नाही. प्रभागातील विकास कामे, वाढीव निधी, शहरातील मुख्य तीन उड्डाणपुलावरून होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी पुलांच्या कठड्यावर जाळ्या उभारणे, घनकचरा, स्वच्छता, पाणी पुरवठा आदी सार्वजनिक हिताच्या प्रस्तावांचा यात समावेश आहे. यापुर्वीची अभय योजना नव्याने सुरू करून अनधिकृत नळ जोडण्या अधिकृत करण्याचाही प्रस्ताव सादर करण्यात आला. परंतु यावर चर्चा करण्यास महापौर तयार नसल्याचा आरोप काँग्रेस-वंचित आघाडीच्या नगरसेवकांनी केला आहे.
शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले
दरम्यान सभेनंतर काँग्रेस-वंचित आघाडीसह 17 नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे गार्हाणे मांडले. या संदर्भात महापौरांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती अब्दुल गफार यांनी दिली. विशेष म्हणजे शहरातील मुख्य रस्ते पीडब्ल्यूडीकडे वर्ग करण्यात आल्यानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम त्याच विभागाचे आहे. परंतु यात यात महापालिकेची अकारण बदनामी होत आहे. मनपा प्रशासन खड्डे बुजविण्यासाठी पीडब्ल्यूडीकडे पाठपुरावा का करीत नाही? असा सवाल गफार यांनी केला आहे.
सभागृहाबाहेर प्रचंड नारेबाजी
एमआयएमने सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा होवून ते मंजूरही होतात. परंतु काँग्रेसच्या प्रस्तावांना बाजुला ठेवले जाते, असा आरोप करून ‘भाजप-एमआयएम भाई-भाई’ अशाही घोषणा काँग्रेस-वंचितकडून ऐकावयास मिळाल्या. आजच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केलेले सर्व प्रस्ताव भाजप-एमआयएम नगरसेवकांच्या फायद्याचे असून विकास कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची टीका नगरसेवक अब्दुल गफार, मुन्ना अब्बास यांनी केली.