लोहा, पुढारी वृत्तसेवा : लोहा तालुक्यातील अंतेश्वर येथील १५० कोटींच्या बंधाऱ्यातून अहमदपूर तालुक्यात पाणी नेण्यासाठी ४ हजार कोटींचा खर्च येणार आहे. या विरोधात आणि विविध ५ मागण्यांबाबत अंतेश्वर बंधारा -धोंड प्रकल्प -लिंबोटी धरण व मन्याड संघर्ष समितीने लोहा तहसिल कार्यालयासमोर आज (दि.१) धरणे आंदोलन केले.
यावेळी अंतेश्वर बंधारा बचाव समितीचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, मार्गदर्शक डॉ. सुनील धोंडगे, मार्गदर्शक -माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड विजय धोंडगे, मार्गदर्शक अॅड चंद्रसेन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल शेटकर माजी पं. स. सभापती बालाजी पांडागळे,माजी पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण, माधव पाटील अनकाडे, विजय केंद्रे, बबन हुलसुरे यांच्यासहित समितीचे सर्व सदस्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंतेश्वर बंधारा -धोंड प्रकल्प -लिंबोटी धरण व मन्याड संघर्ष समितीच्या धरणे आंदोलनातील प्रमुख मागण्या:-अंतेश्वर बंधारा येथुन लोहा तालुक्यातील हक्काचे लिफ्ट द्वारे अहमदपुरला जाणारे पाणी त्यांची मान्यता रद्द करुन सदरील प्रकल्पातुन लोहा तालुक्यातील गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, धोंड प्रकल्पाला पुरेसा निधी उपलब्ध करून देऊन सदरील धरणाचे काम दोन वर्षांत पुर्ण करुन शेतीला पाणी द्यावे, लिंबोटी धरणातुन माळेगाव, माळाकोळी परिसरातील शेतीला पाणी देण्यासाठी तत्वतः मंजुरी मिळालेली जय मल्हार उपसिंचन योजनेस नव्याने मान्यता देऊन सदरील योजनेस भरघोस निधी उपलब्ध करुन द्यावा, कलंबर पुच्छ वितरीका योजनेस नव्याने मान्यता देऊन सदरील योजना कार्यान्वित करावी, यापुढे लोहा -कंधार तालुक्यातील धरणाचे हक्काचे पाणी इतर जिल्ह्यांस देण्यात येऊ नये, या प्रमुख पाच मागण्यां करण्यात आल्या आहेत.
यावेळी बोलताना अंतेश्वर बंधारा संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार म्हणाले की, अंतेश्वर येथील दीडशे कोटींच्या बंधाऱ्यातून अहमदपूर तालुक्यात पाणी नेण्यासाठी चार हजार कोटीं खर्च येणार आहे. अंतेश्वर बंधाऱ्यातील पाणी लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीलाच मिळावे, बाहेर जिल्ह्यात जाऊ नये, अन्यथा, रास्ता रोको आंदोलन करू.