नांदेड : गेल्या काही दिवसांतील गँगवॉर आणि पाच खुनांच्या मालिकेने नांदेड शहर हादरले असतानाच, आता चाकू हल्ल्याच्या दोन नवीन घटनांनी शहरात पुन्हा दहशत पसरली आहे. पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची धिंड काढली आणि शस्त्र जप्ती केली असली, तरी प्रत्यक्षात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरला नसल्याचे चित्र या घटनांवरून दिसत आहे. या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये “नांदेडात कायद्याचे राज्य आहे का?“ असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
कारवायांचा उपयोग काय?
जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून गेल्या सात दिवसांत 112 जणांवर कारवाया केल्या आणि घातक शस्त्रेही जप्त केली. मात्र, पोलिसांच्या या धाडसत्राला गुन्हेगार जुमानत नसल्याचे दिसत आहे. किरकोळ कारवाया करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा सक्रिय गँग आणि गुंडांची हिटलिस्ट काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
इतवारा भागात तरुणावर वार
शहरातील इतवारा भागात सोमवारी किरकोळ कारणावरून वादाची ठिणगी पडली. सोनू अतुल ढगे (वय 18, रा. सिद्धार्थ नगर) याने विशाल उर्फ चिकू दिलीप डोंगरे (वय 24) याला शिवीगाळ करत चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विशाल डोंगरे याने दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक भारती तपास करत आहेत.
उशिरा आल्याच्या कारणावरून भावावर हल्ला
दुसरी घटना वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नल्लागुट्टा चाळ येथे घडली. राजू सुनके (वय 42) याने आपला लहान भाऊ शेखर सुनके (वय 40) याला “घरी उशिरा का आलास?“ म्हणून जाब विचारला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या राजूने शेखरच्या पोटात चाकू भोसकला. याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक बुलंगे पुढील तपास करत आहेत.