Kinwat Unseasonal Rain
किनवट : नांदेड जिल्हा परिसरात २२ फेब्रुवारीपासून अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभाग आणि तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर किनवट तालुका येथे सोमवारी ढगांच्या गडगडाटासह जोरदार सरी कोसळल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. रविवारी (दि. २२) रात्री सुमारे १० वाजता तसेच सोमवारी (दि. २३) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या पावसामुळे काढणीच्या टप्प्यावर असलेल्या रब्बी पिकांवर संकटाचे सावट दाटले आहे.
२३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान काही भागात गारपीट होण्याची शक्यताही वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. विशेषतः हरभरा, गहू आणि ज्वारी या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. तालुक्यात सध्या हरभऱ्याची काढणी सुरू असून गहू, मका आणि ज्वारी ही पिके अंतिम वाढीच्या अवस्थेत आहेत.
अवकाळी सरींमुळे उभ्या पिकांसोबतच काढणी करून शेतात साठवून ठेवलेल्या मालालाही धोका निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांनी काढलेला हरभरा शेतातच ठेवला असून पावसामुळे तो भिजण्याची शक्यता आहे. गारपीट झाल्यास हरभऱ्याचे घाटे झडणे, गव्हाचे दाणे ओलाव्यामुळे काळवंडणे आणि ज्वारीच्या कणसांचे नुकसान होणे अशी हानी संभवते. तसेच वाढीच्या टप्प्यातील मका पिकात पाणी साचल्यास मुळांना इजा होणे, खोड आडवे पडणे आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणे यामुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण, वाढलेली आर्द्रता आणि तापमानातील चढ-उतार यामुळे हवामान अस्थिर झाले आहे. त्यामुळे शेतकरी काढणीचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी धडपड करत असून शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलविण्याला प्राधान्य देत आहेत.
दरम्यान, कृषी विभागाने समाजमाध्यमांवरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवता अधिकृत हवामान अंदाजावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. काढलेला माल झाकून ठेवणे, तातडीने कापणी पूर्ण करणे, तसेच ताडपत्री किंवा प्लास्टिक कव्हरचा वापर करणे, अशा उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यास किनवट तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असून प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून संभाव्य नुकसानीसाठी तयारी ठेवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.