Kinwat Farmers Protest
किनवट : किनवट तालुक्यात सुरू असलेल्या भरडधान्य खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने केला आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना हमीभावापासून वंचित ठेवून व्यापाऱ्यांचा माल शासनाच्या खरेदी केंद्रांमार्फत विकला जात असल्याचा दावा संघटनेने केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ५ जून रोजी इस्लापूर चौकात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
उपप्रादेशिक अधिकारी प्रफुल्ल सोयाम यांना सादर केलेल्या निवेदनात संघटनेने नमूद केले की, किनवट तालुक्यात सुमारे १० हजार हेक्टर क्षेत्रावर मका व ज्वारीची लागवड करण्यात आली आहे. मात्र, भरडधान्य खरेदी प्रक्रियेत होणारा विलंब आणि कथित अनियमिततेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
प्रशासनाने १३ एप्रिलपासून ऑनलाइन नोंदणी सुरू करण्याची घोषणा केली होती. तथापि, त्यापूर्वीच १० ते १२ एप्रिलदरम्यान ‘टेस्टिंग’च्या नावाखाली काही नोंदणी करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या नोंदी रद्द करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते; मात्र सध्या सुरू असलेल्या खरेदी प्रक्रियेत त्याच नोंदींचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, इस्लापूर खरेदी केंद्रावर मोठ्या ट्रकद्वारे धान्याची आवक होत असून तो माल व्यापाऱ्यांचा असल्याचा संशय आहे. आर्थिक अडचणीमुळे अनेक शेतकरी आपला माल कमी दरात व्यापाऱ्यांना विकतात. त्यानंतर तोच माल हमीभावाने शासनाला विकला जात असल्याने व्यापाऱ्यांना मोठा लाभ होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
२२ मेपासून सुरू झालेल्या खरेदी प्रक्रियेत आतापर्यंत १८ शेतकऱ्यांकडून सुमारे १२०० क्विंटल मका आणि ३६ शेतकऱ्यांकडून सुमारे १३०० क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली आहे. यंदा आदिवासी विकास महामंडळाला ४५ हजार क्विंटल ज्वारी आणि ६५ हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
मात्र, विद्यमान गोदामांमध्ये मर्यादित साठवण क्षमता उपलब्ध असून बारदान्याचाही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जलधरा, बोधडी, चिखली, किनवट, राजगड, सारखणी आणि मांडवी येथे अतिरिक्त खरेदी केंद्रे सुरू करावीत, बाजार समितीची गोदामे उपलब्ध करून द्यावीत तसेच बचत गटांच्या माध्यमातून खरेदी प्रक्रिया गतिमान करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
दरम्यान, उपप्रादेशिक व्यवस्थापक प्रफुल्ल एस. सोयाम यांनी सर्व आरोप फेटाळून लावताना सांगितले की, नोंदणी प्रक्रियेदरम्यान मोठी गर्दी झाल्याने सुरुवातीला शेतकऱ्यांची नावे नोंदविण्यात आली होती. त्यानंतर सातबारा ऑनलाइन अपलोड करताना काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्या. त्या दुरुस्त करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली .
१३ एप्रिलपासून झालेल्या अधिकृत नोंदणी यादीप्रमाणेच भरडधान्य खरेदी केली जाणार आहे. संबंधित तांत्रिक त्रुटीबाबत संगणक ऑपरेटरला नोटीसही बजावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भरडधान्य खरेदी प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, शेतकऱ्यांनी कोणताही गैरसमज न बाळगता सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.