Khanapur Short Circuit Fire
देगलूर : देगलूर तालुक्यातील खानापूर येथे शुक्रवारी (दि. १९) रात्री शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत लॉन्ड्री, फर्निचर आणि किराणा दुकानांतील साहित्य भस्मसात झाले असून सुमारे सहा लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गावातील महादेव मंदिरासमोरील बाबूभाई मेहताबसाब शेख यांचे किराणा दुकान, हणमंत वरटी यांचे लॉन्ड्री दुकान आणि गोविंद पांचाळ यांचे फर्निचर दुकान एकमेकांच्या शेजारी आहेत. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
आगीत फर्निचर दुकानातील यंत्रसामग्री, सागवानी चौकटी, तयार दरवाजे तसेच ग्राहकांसाठी तयार करून ठेवलेले सहा सागवानी पलंग जळून खाक झाले. लॉन्ड्रीतील यंत्रसामग्री आणि ग्राहकांचे कपडेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तर किराणा दुकानातील संपूर्ण माल नष्ट झाल्याने संबंधित व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर देगलूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत तिन्ही दुकानांतील बहुतांश साहित्य जळून गेले होते.
या दुर्घटनेत तिन्ही व्यापाऱ्यांचे मिळून सहा लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अचानक उद्भवलेल्या या आगीमुळे संबंधित व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले असून शासनाने पंचनामा करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.