नांदेड : जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतुकीविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत अर्धापूर पोलिसांनी कॅनॉल परिसरातील करीम कॉलनीत धाडसी कारवाई केली. कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या आणि वाहतुकीच्या तयारीत असलेल्या १२ गोवंशीय जनावरांची (बैल) सुटका करत, एक महिंद्रा पिकअपसह एकूण ८ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर यांना गोपनीय बातमीदाराकडून करीम कॉलनीतील कॅनॉलजवळ गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक व साठा होत असल्याची पक्की माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी तातडीने परिसरात सापळा रचला. पाहणीदरम्यान तीन बैल 'महिंद्रा पिकअप' (क्रमांक MH-32-Q-5138) मध्ये निर्दयीपणे कोंबलेले आढळले, तर उर्वरित नऊ बैल जवळच असलेल्या टिनपत्र्यांच्या शेडमध्ये कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी तात्काळ सर्व १२ बाळगांची (किंमत ₹४,६५,०००) सुटका केली. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे चार लाखांचे पिकअप वाहन जप्त केले. या प्रकरणी तुळशिदास दादाराव गावंडे (रा. विठोली, यवतमाळ), शेख करीमुद्दीन शेख वहीमोद्दीन (रा. अर्धापूर) आणि नामदेव देवराव नरवाडे (रा. शेवाळा, हिंगोली) या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, शिवाजी किशनराव मस्के (रा. शेणी) हा आरोपी फरार आहे.
या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम व भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर व त्यांच्या पथकाने पार पाडली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश भोसले करत आहेत.