Sahasrakund project farmers protest
हिमायतनगर : सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी हदगाव आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी पावसाळी अधिवेशनात केल्यानंतर, बुडीत क्षेत्रात येणाऱ्या पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. "जान देंगे, जमीन नहीं देंगे" अशा घोषणांनी सरकार आणि लोकप्रतिनिधींविरोधात आवाज बुलंद करण्यात आला.
शनिवारी (दि.९) हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे जवळपास चाळीस गावांतील हजारो शेतकऱ्यांची संयुक्त सभा झाली. या सभेचे अध्यक्ष बाबुराव वानखेडे होते. निम्न पैनगंगा धरण विरोधी समितीचे अध्यक्ष प्रल्हाद जगताप पाटील, संघटक सचिव मुबारक तवर, सचिव विजय पाटील, वि.ना. कदम आदींनी भाषणे केली.
नेत्यांनी सांगितले की, हा प्रकल्प प्रथम 1962-65 दरम्यान स्थगित करण्यात आला होता, कारण पैनगंगा नदीकाठची जमीन अतिशय सुपीक आहे. नंतर 2009-11 मध्ये प्रकल्प पुनर्जिवीत झाला, मात्र जनसुनावणीनंतर पुन्हा थांबवण्यात आला. आता, आमदारांच्या मागणीवरून प्रकल्पाचा सर्वे करण्यासाठी 700 कोटी रुपये मंजूर झाले असून प्रकल्प पुन्हा गतिमान झाला आहे.
शेतकऱ्यांचा ठाम आग्रह आहे की, विकासाच्या नावाखाली सुपीक जमीन बुडवू नये. त्याऐवजी नदीवर बंधारे बांधून सिंचनाचा प्रश्न सोडवावा. शेतकऱ्यांनी इशारा दिला की, जर शेकडो हेक्टर शेती प्रकल्पाखाली बुडवण्याचा प्रयत्न झाला, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल.या सभेला महिला-पुरुष, तरुण, ज्येष्ठ अशा मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.