Nanded land fraud pudhari photo
नांदेड

Nanded land fraud : बनावट कागदपत्रांच्या आधारे एकाच जमिनीची वारंवार विक्री

तब्‍बल ३५ लोकांची केली ११.८५ कोटींची फसवणूक; मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : बनावट दस्तऐवज आणि ७/१२ उतारा तयार करून एकाच शेतजमिनीचे परस्पर वारंवार सौदे करत कोट्यवधी रुपयांचा अपहार करणाऱ्या संघटित रॅकेटचा वजीराबाद पोलीस आणि नांदेड शहर उपविभागीय पोलीस पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत ३५ नागरिकांची तब्बल ११ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

​राहुल नागोराव गायकवाड (वय ३८, रा. शिवरायनगर, नांदेड), जखाजी ऊर्फ बंडू धोंडजी पावडे (वय ४३, रा. पुयणी, ता. नांदेड) आणि अमोल अशोकराव मालेगावकर (वय ४२, रा. जोतीबानगर, नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

जानेवारी २०२६ मध्ये मुख्य आरोपी राहुल गायकवाड याने फिर्यादी देवेंद्र शर्मा यांच्या दुकानावर जाऊन त्यांच्याशी ओळख वाढवली. मौजे मेंढला खुर्द (ता. अर्धापूर) येथील गट क्र. ७३ मधील जमीन स्वतःच्या मालकीची असल्याचे सांगून शर्मा यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी बनावट कागदपत्रे दाखवून १ कोटी २६ लाख रुपयांत व्यवहार ठरवला.

१८ फेब्रुवारी २०२६ रोजी एकादशी हॉटेल येथे नोटरीकृत सौदाचिट्ठी करून फिर्यादीकडून ३५ लाख रुपये रोख स्वीकारले. मात्र, सौद्यानंतर आरोपींनी तीच जमीन इतर अनेकांना विकल्याचे समोर आले. पैसे परत मागितले असता आरोपींनी टाळाटाळ केली, ज्यामुळे फसवणूक झाल्याचे शर्मा यांच्या लक्षात आले.

दरम्‍यान ​नागरिकांनी कोणतीही जमीन किंवा प्लॉट खरेदी करताना महसूल विभागाकडून मूळ मालकी, ७/१२ उतारा आणि कायदेशीर कागदपत्रांची खात्री करूनच व्यवहार करावेत. या टोळीकडून फसवणूक झालेल्या नागरिकांनी तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय किंवा वजीराबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कारवाई आणि पोलिसांचे आवाहन

या प्रकरणी राहुल गायकवाड व अमोल मालेगावकर पोलीस कोठडीत असून, जखाजी पावडे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी रामेश्वर वेंजने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोउपनि मिलिंद सोनकांबळे आणि भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने केली.

गुन्‍ह्याची व्‍याप्‍ती मोठी

वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने १३ सप्टेंबर रोजी तपासाची सूत्रे उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्याकडे सोपवण्यात आली. सखोल तपासात आरोपींनी एकाच जमिनीच्या आधारे तब्बल ३५ नागरिकांकडून ११ कोटी ८५ लाख रुपये लाटल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत १६ नागरिकांचे जबाब नोंदवून त्यांच्याकडील सौदाचिट्ठी जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीविरोधात यापूर्वीच सुमारे १२ दिवाणी व फौजदारी दावे दाखल आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT