Nanded DCC Bank pudhari photo
नांदेड

Nanded DCC Bank : तोटामुक्त झालेली जिल्हा सहकारी बँक आता सुस्थितीत !

नव्या संचालक मंडळाची आज पहिली सभा

पुढारी वृत्तसेवा

विशेष प्रतिनिधी

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या संचालक मंडळाच्या शनिवारी (दि.२९) होणाऱ्या पहिल्याच बैठकीसमोर बँकेची जूनअखेरची आर्थिक परिस्थिती ठेवली जाणार आहे. मार्च २०२५ अखेर ही बैंक संचित तोट्यातून बाहेर आली आहे. २० वर्षापूर्वीच्या कठीण परिस्थितीतून ही बँक आता सुस्थितीत आली आहे.

बँकेच्या संचालक मंडळातील बहुसंख्य संचालक नवे आणि नवखे असल्यामुळे त्यांना आर्थिक परिस्थिती अवगत व्हावी, यासाठी प्रशासनाने तुलनात्मक माहिती सभेसमोर ठेवण्याची तयारी करून ठेवली आहे. डॉ. तुषार राठोड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेसमोर वेगवेगळे विषय ठेवण्यात आले आहेत.

२००४-०५ दरम्यान या बँकेचे संचालक मंडळ भारतीय रिझर्व बँकेच्या आदेशानुसार बरखास्त करण्यात आल्यानंतर या बँकेवर तब्बल १० वर्षे प्रशासकीय राजवट होती. मार्च २००७ मध्ये बँकेचे नक्त मूल्य उणे ३२५ कोटी तर संचित तोटा सुमारे पावणेचारशे कोटी रू. होता; पण आता नवत्त मूल्य अधिक २९० कोटी रू. असून मागील संचित तोटा भरून काढत ही बैंक नफ्यात आलेली आहे; पण लेखा परिक्षणात ती अद्याप 'अ' वर्गामध्ये आलेली नाही.

पद्मश्री श्यामराव कदम यांच्या काळापासून मोहन पाटील टाकळीकर यांच्या कार्यकाळापर्यंत नांदेड जिल्हा सहकारी बँकेला रिझर्व बँकेचा बैंकिंग परवानाच नव्हता. मुख्य कार्यालयातील शाखेशिवाय जिल्हाभर या बँकेच्या शाखांची संख्या शंभरावर गेली होती. प्रशासकीय राजवटीत या बँकेला रिझर्व बँकेचा परवानाही मिळाला तसेच देशाच्या मध्यवर्ती बँकेने कलम ३५ (अ) खाली लावलेले आर्थिक निर्बंधही उठविण्यात आले.

मागील १० वर्षात बँकेचे मुख्यालय व सर्व शाखा सीबीएस प्रणालीद्वारे जोडण्यात आल्या. इतर व्यावसायिक बँकांप्रमाणेच जिल्हा बँकेच्या ग्राहकांना आरटीजीएस, एनहएफटी अशा आधुनिक सुविधाही आता उपलब्ध झाल्या आहेत.

मार्च २००७ अखेर जिल्हा बँकच्या एनपीएचे प्रमाण ८७.९५ टक्के इतके होते. ते मार्च २०२६ अखेर १५ टक्क्यांच्या आत आले आहे. बँकेच्या प्रतिशाखा व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. खेळते भांडवल ८३४ कोर्टीवरून १७७१ कोटींवर गेले आहे.

व्यवस्थापकीय खर्चातही लक्षणीय घट झाली आहे. मार्च २००७ अखेर बँकेची गुंतवणूक जेमतेम ३५ कोटी होती ती आता ३७४ कोर्टीवर गेली आहे. २० वर्षांपूर्वी अनिष्ट तफावत १३८ कोटी होती. ती आता ४४.५९ कोटी पर्यंत खाली आली आहे. मार्च २०२५ पासून ही बैंक तोट्यातून मुक्त झाली. सध्या बँकेच्या ६४ शाखांमधून शेतकरी व इतर ग्राहकांना सेवा पुरविली जात आहे. कर्मचा-यांची संख्या मार्च २०२६ अखेर १५४ होती, ती आता १२९ पर्यंत खाली आली आहे.

  • जिल्हा बँकेच्या निर्वाचित संचालकांची संख्या आता २३ झाली आहे. सहकार अधिनियमांतील तरतुदींनुसार बँकेचे संचालक मंडळ दोन तज्ज्ञ संचालकांची नियुक्त्ती करू शकते. बँकिंग, व्यवस्थापन, वित्त व लेखा किंवा संस्थेच्या उद्देश व कार्य पद्धतीच्या अनुषंगाने पाच वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तीची तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती करता येते. अशा व्यक्तीची शैक्षणिक अर्हता पदव्युत्तर वा त्याहून अधिक शिक्षणाची असावी. शनिवारच्या सभेसमोर तज्ज्ञ संचालक नियुक्तीचा विषय असला, तरी याच सभेत ही नियुक्ती होण्याची शक्यता नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT