नायगाव : पळसगाव येथील गाजलेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणातील प्रमुख फरार आरोपी तथा माजी सरपंच शिवाजी शेषराव शिंदे याला अखेर नायगाव पोलिसांनी अटक करून तब्बल ४५ दिवसांच्या शोधमोहीमेचा शेवट केला. अटक टाळण्यासाठी सातत्याने ठिकाणे बदलणाऱ्या आरोपीला गुप्त माहितीच्या आधारे बाफना पॉईंट परिसरात सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे नायगाव पोलिसांच्या तपासाला मोठे यश मिळाले असून तालुक्यात याची जोरदार चर्चा सुरू आहे.
१४ जून रोजी पळसगाव येथे झालेल्या तुंबळ हाणामारीनंतर दोन्ही गटांतील १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा क्रमांक १४५/२०२६ नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध गंभीर कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी लावल्याच्या रागातून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले. "चौकशी का लावली?" असा जाब विचारत शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमक्या देत कुऱ्हाड, लोखंडी रॉड, काठ्या व दगडांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात फिर्यादी, त्यांचे वडील व भाऊ गंभीर जखमी झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.
या प्रकरणात अटक टाळण्यासाठी शिवाजी शिंदे यांनी अतिरिक्त सत्र न्यायालय, बिलोली येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र २९ जुलै २०२६ रोजी न्यायालयाने तो फेटाळून लावत तपासासाठी आरोपीची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. प्रथमदर्शनी गंभीर आरोप असल्याचे नमूद करत न्यायालयाने कोणतेही संरक्षण देण्यास नकार दिला.
जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नायगाव पोलिसांनी आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलेहोते. गुप्त माहितीच्या आधारे नायगाव पोलिसांनी आखलेल्या नियोजनबद्ध सापळ्यात बाफना पॉईंट परिसरातून त्याला रविवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले. तब्बल ४५ दिवस पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर गजाआड झाला.
दरम्यान, शिवाजी शेषराव शिंदे यांच्याविरुद्ध यापूर्वीही ग्रामपंचायत कारभारातील कथित अनियमितता, मतदार यादीतील कथित गैरप्रकार आदींबाबत स्थानिक स्तरावर आरोप झाले आहेत. या आरोपांबाबत स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया सुरू असून त्यावर अंतिम निर्णय संबंधित न्यायालयांकडून होणे बाकी आहे.
या अटकेविषयी नायगाव ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल भगत यांना संपर्क केला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला.या मुळे पळसगाव परिसरात कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर पोलिसांचा कठोर वचक कायम असल्याचा संदेश गेल्याची चर्चा असून, प्रकरणाचा पुढील तपास तोटा वाड यांच्या कडे असून नायगाव पोलीस ठाण्याचे सपोनी तोटावाड मात्र नेहमी प्रमाणे फोन घेणे टाळले, पुढील तपास ते करीत आहेत.