माहूर : तालुक्यातील रुई येथे शेतीच्या वादातून चुलत भावाने छातीवर विळ्याने सपासप वार करून भावाचा निर्घृण खून केला. ही घटना रविवारी (दि.१८) सकाळी ९ च्या सुमारास पोलिस पाटील यांच्या घरी व तंटामुक्ती अध्यक्ष आणि गावकऱ्यांच्या समोरच घडली. परवेझ पंटूस देशमुख (वय २१वर्षे) असे खून झालेल्या भावाचे नाव असून साहिल बबलू देशमुख (रा. किनवट ) याच्याविरूद्ध माहुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, परवेजचे वडील पंटूस देशमुख यांच्या नावावर रूई शिवारात २० गुंठे एवढी शेतजमीन आहे. या जमीनीबाबत त्याच्या पुतण्यांबरोबर त्यांचा वाद होता. या जमीनीबाबत आज (रविवारी) पोलिस पाटील परसराम भोयर यांच्या घरी बैठक बसली. तिथे दोघांची बाजू समजून घेण्यात आली. व एकूण शेतीसंदर्भात पुन्हा वाद करू नका, असा सल्ला दोन्ही बाजूला देण्यात आला. बैठक संपल्यावर सोहेब देशमुख याने परवेझ यास पाठीमागून पकडले व साहिल देशमुख याने हातातील लोखंडी विळ्याने त्याच्या छातीवर सपासप वार केले. जखमी अवस्थेत त्याला माहुर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिथून त्याला पुसद येथील खाजगी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.