नांदेड : पुढारी वृत्तसेवा : शंकरनगर जवळील मौजे चिटमोगरा (ता.बिलोली) येथे सोयाबीन पिकावर औषध फवारण्यासाठी गेलेल्या शिवाजी मलबा काळेकर (वय ३५) यांचा तलावात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी घडली. त्यांचा मृतदेह आज (दि.१७) सापडला. त्यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिटमोगरा येथील शिवाजी काळेकर शुक्रवारी दुपारी सोयाबीनवर औषध फवारण्यासाठी गेले होते. यावेळी ते जवळच असलेल्या तलावात पाणी आणण्यासाठी गेले होते. त्यांचा पाय घसरून तलावात पडले. त्यांचा शोध सुरू होता. आज सकाळी (दि. १७) दहा वाजता त्यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. नायगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेहावर चिटमोगरा येथे अंत्यविधी करण्यात आला. रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस जमादार शिंदे करीत आहेत. शिवाजी काळेकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व मुलगा असा परिवार आहे.