पूर्णा : रब्बी हंगामातील हरभरा खरेदीसाठी शासनाने परवानगी दिल्यानंतरही बारदानाअभावी पूर्णा तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे केंद्र तब्बल महिनाभरापासून ठप्प आहे. एकीकडे शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) नियमित बारदान पुरवठा होत असताना सहकारी संस्थांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. या दुजाभावामुळे संतप्त शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे धाव घेत न्याय मागितला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
१० मार्चपासून खरेदीस सुरुवात झाली, मात्र प्रारंभीच अत्यल्प बारदाना मिळाल्याने तीन दिवसांतच साठा संपला. नंतर वारंवार पाठपुरावा करूनही जिल्हा फेडरेशनकडून बारदानाचा पुरवठा झाला नाही. परिणामी नाईलाजाने खरेदी केंद्र बंद ठेवावे लागले, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासकीय हमीभावात हरभरा विक्रीसाठी नोंदणीतील असंख्य शेतकऱ्यांचे व्यवहार अडकले.
मुला-मुलींच्या लग्ल कार्यासाठी, कर्जफेडीसाठी आणि दैनंदिन खर्चासाठी या पैशांवर अवलंबून असलेले शेतकरी सध्या हवालदिल झाले. खरेदी केंद्र बंद असल्याने अनेकांना लग्नकार्य पुढे ढकलण्याची वेळ आली. एफपीसी आणि इतर केंद्रांवर बारदानाचा नियमित पुरवठा होत असताना सहकारी संस्थांना का डावलले जाते? असा सवालउपस्थित होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची तक्रार केली.
चेअरमन बापूराव घाटोळ यांनी पालकमंत्री बोडर्डीकर यांची भेट घेत सहकारी खरेदी केंद्रांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती देत तातडीने बारदाना उपलब्ध करून देण्याची मागणी केली. अन्यथा शेतकरी रस्त्यावर हरभरा ओतून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. यावर पालकमंत्री बोर्डीकर यांनी दोन दिवसांत बारदाना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.
पूर्णा तालुका सहकारी खरेदी-विक्री केंद्रावर बारदान्याअभावी महिनाभर खरेदी बंद पडलेली आहे. शेतकरी आणि संस्था दोन्ही आर्थिक संकटात सापडले आहेत. तातडीने बारदाना मिळाला नाही, तर आंदोलन अपरिहार्य ठरेल अशी प्रतिक्रिया संघाचे चेअरमन बापूराव घाटोळ यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे.