बाळासाहेब पांडे
नायगाव ः नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील गडगा येथे गौण खनिजांच्या नावाखाली सुरू असलेली मुरूम लूट आता सरळसरळ व्यवस्थात्मक गुन्ह्यात रूपांतरित झाल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. माळरान, गायरान आणि सार्वजनिक जमिनी अक्षरशः पोखरल्या जात असताना महसूल प्रशासन मात्र जाणूनबुजून डोळेझाक करत आहे का, असा थेट सवाल संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत.
गडगा परिसरात नाममात्र रॉयल्टीच्या आधारे शासनाच्या मालकीच्या मुरूमची खुलेआम चोरी सुरू आहे. परवानगी दाखवून नियमांना केराची टोपली दाखवली जात असून पूर्ण डोंगरमाळराने खोल खड्ड्यांनी विदीर्ण झाली आहेत. परिणामी पर्यावरणाचा समतोल बिघडत असून भविष्यात पाणीटंचाई, भूधसरण आणि अपघातांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
अवैध उत्खनन रोखण्यासाठी नेमलेली पथके प्रत्यक्षात निष्क्रिय की माफियांशी ‘सेटिंग’मध्ये आहेत, अशी उघड चर्चा नागरिकांत सुरू आहे. एकही ठोस कारवाई नाही, गुन्हे दाखल नाहीत; मात्र महसूलचा कोट्यवधींचा बुडवडा सुरूच आहे. त्यामुळे मुरूम माफियांचे फावले असून सामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
शासनाकडून फक्त 100 ब्रास मुरूम उत्खननाची रॉयल्टी मंजूर असताना, त्याच परवानगीच्या आडून हजारो ब्रास मुरूम गायरान व सार्वजनिक जमिनीतून बेकायदेशीरपणे उपसला जात आहे. रॉयल्टी केवळ 0.81 आर क्षेत्रापुरती मर्यादित असताना, प्रत्यक्षात मात्र मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून टिप्परच्या सहाय्याने अवैध वाहतूक सुरू आहे.
रात्रीचा अंधार आणि दिवसा निर्ढावलेपणा
चार दिवसांपासून रात्रीच्या अंधारात आणि भरदिवसा अवैध मुरूम उपसा व वाहतूक बिनधास्त सुरू आहे. राजकीय वरदहस्त लाभलेल्या फंटरचे टिप्पर रस्त्यांवरून सुसाट धावत असून कायदासुव्यवस्थेचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. विशेष म्हणजे ही मुरूम वाहतूक गडगा मार्गे नरसीकडे दिवस-रात्र सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत. या गंभीर प्रकरणाकडे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तातडीने लक्ष घालावे, स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावेत, दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि अवैध गौण खनिज उत्खनन तात्काळ बंद करावे, अशी ठाम मागणी नायगाव व गडगा येथील नागरिकांतून होत आहे. अन्यथा हा संताप उद्रेकाच्या दिशेने जाईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.