मुखेड : शेती व्यवसायात यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्याने दर्जेदार, मजबूत रस्त्यांची गरज निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेत नेणे सुलभ व्हावे यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना सुरू केली आहे. ही योजना मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना विधानसभा क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. तुषार राठोड यांनी केल्या.
मुखेड तहसील कार्यालयात या योजनेच्या नियोजनासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी क्षेत्रीय सचिव उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांनी योजनेचे स्वरूप, शासन निर्णय, अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती दिली.
या योजनेसाठी प्रत्येक गावातून एकापेक्षा जास्त प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. मात्र, निवड समितीने गावाची निवड करताना ही योजना खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, या दृष्टीने लक्ष द्यावे अशी सूचनाही त्यांनी केली.
या बैठकीला तहसीलदार राजेश जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता केसलीवाल, गटविकास अधिकारी ढवळे यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय प्रमुख उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे तंटे मिटणार; प्रवास सुकर होणार
आमदार राठोड पुढे म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून शेत, पाणंद रस्त्यांच्या कारणावरून ग्रामीण भागात वाद होत होते. रस्त्यांच्या अभावामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतात जाणे जिकीरीचे व्हायचे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे शेतकऱ्यांना मजबूत रस्त्यांची सोय उपलब्ध होईल. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावांना भेटी देऊन, लोकांशी संवाद साधून हे विकासप्रश्न मार्गी लावावेत.