Media and activists are troubled by office delays in counting of votes despite EVMs
नांदेड, पुढारी वृत्तसेवा
महानगरपालिका नांदेड-वाघाळा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेत प्रशासनाच्या नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभाराचे दर्शन घडले. मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यापासून ते निकालाची माहिती देण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर झालेल्या दफ्तर दिरंगाईमुळे माध्यमांच्या प्रतिनिधींसह उमेदवारांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.
प्रशासनाने निकालासाठी माध्यम कक्ष स्थापन केला होता, मात्र तेथील नियोजन कोलमडल्याचे दिसून आले. सकाळी ९.३० वाजता सुरू झालेली टपाली मतमोजणी चक्क दुपारी १ वाजेपर्यंत चालली. त्यानंतर ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी सुरू झाली, मात्र तिला अपेक्षित वेग नव्हता.
क्रमाचा गोंधळ आणि माईक बंद
२० प्रभागांतील ८१ जागांसाठी १२ टेबलवर मतमोजणी सुरू होती. मात्र, मतमोजणीचा कोणताही निश्चित क्रम नव्हता. सुरुवातीला प्रभाग क्रमांक १६, १७, १८ ची पहिली फेरी जाहीर झाली, त्यानंतर अचानक प्रभाग ७, ८, ९ ची माहिती देण्यात आली. प्रशासनाने १ पासून २० पर्यंत क्रमवार निकाल देणे अपेक्षित होते, मात्र विस्कळीत क्रमवारीमुळे मोठा गोंधळ उडाला. त्यातच प्रशासनाने मीडिया सेंटरमधील ध्वनिक्षेपक (भोंगे) बंद केल्याने माहिती मिळवणे कठीण झाले.
अधिकृत निकालाविनाच जल्लोष
सायंकाळी ५ वाजले तरी प्रशासनाकडून एकही निकाल अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला नव्हता. मात्र, दुसरीकडे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे बाहेर गुलाल उधळून जल्लोष करत होते. पत्रकारांना जनसंपर्क अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा करावी लागत होती. व्हॉट्सअॅप ग्रुपवर अत्यंत संथ गतीने माहिती येत होती. रात्री ७वाजेपर्यंत केवळ १० ते १२ जागांचेच अधिकृत निकाल समजू शकले. त्यामुळे अनेक पत्रकारांनी उमेदवार किंवा एजंटांकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून राहत बातम्या दिल्या. सकाळी ९.३० वाजता सुरू झालेले मतमोजणीचे गुऱ्हाळ रात्री ९ वाजेपर्यंत, म्हणजेच तब्बल १२ तास सुरू होते. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे माध्यम प्रतिनिधींनीही नाराजी व्यक्त करत कक्षातून काढता पाय घेतला.
सोशल मीडियावर आकडेवारीचा खेळ
मीडिया कक्षात माहिती मिळत नसल्याने पत्रकारांना बाहेर येणाऱ्या प्रतिनिधींवर अवलंबून राहावे लागले. यामुळे सोशल मीडियावर अनेक बिनबुडाचे आणि अनधिकृत निकाल फिरू लागले. अधिकृत माहितीच्या अभावामुळे कोण जिंकले आणि कोण हरले, याबाबत नागरिकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बराच वेळ संभ्रमावस्था निर्माण झाली होती.
ईव्हीएम असूनही कारभार बैलगाडीच्या वेगाने
प्रशासनाचा ढिसाळपणा केवळ मतमोजणीतच नव्हे, तर मतदानाच्या दिवशीही दिसून आला. मतदानाची वेळ संपल्यानंतर दोन तासांत टक्केवारी समजणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाने मध्यरात्री १ वाजता, तब्बल ६ तास उशिराने मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली. ईव्हीएम मशीनचा वापर करूनही निकाल आणि आकडेवारीसाठी तासनतास वाट पाहावी लागल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे