मुखेड : खरीप हंगामाच्या सुरुवातीला उशिरा झालेल्या पेरणीनंतर दमदार पावसामुळे पिकांची परिस्थिती सुधारली होती. मात्र, पिकांच्या अंतिम टप्प्यात पावसाची आवश्यकता असताना मागील ४० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमदार राठोड यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीबाबत चर्चा केली. पावसाने पाठ फिरवल्याने उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
पिकांच्या शेवटच्या टप्प्यात पावसाअभावी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या मनातील चिंता लक्षात घेऊन शासनाने खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे आमदार राठोड यांनी सांगितले.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती आणि त्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन संपूर्ण मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.
शेतकरी संकटात असताना त्यांच्या हक्कांसाठी, कष्टासाठी आणि भविष्यासाठी शासन दरबारी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी स्पष्ट केले. दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.