नांदेड

मराठा आरक्षणासाठी सरकारला सद्बुद्धी द्या: जरांगे-पाटील यांचे जिजाऊंना साकडे

अविनाश सुतार

सिंदखेडराजा: पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी आज (दि.१२) जिजाऊ जन्मस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे- पाटील म्हणाले की, गोरगरीब मराठ्यांवर अन्याय होत आहे. मराठा समाजाची मुले आरक्षणाअभावी वेदना सहन करत आहेत. त्यामुळे जिजाऊंनी सरकारला सद्बुद्धी द्यावी.

शेतकरी सध्या प्रचंड संकटामध्ये आहे. त्यांनाही भरघोस मदत करण्याची सद्बुद्धी शासनाला द्यावी, असे साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले. राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यामध्ये जरांगे- पाटील यांचे आगमन होताच शेकडो युवकांनी मराठा आरक्षणाबाबत जोरदार घोषणाबाजी केली. घोषणांनी राजवाडा परिसर दणाणून गेला. जरांगे- पाटील पुढे म्हणाले की, मराठा समाज एकजूट झालेला आहे.

सत्ताधाऱ्यांना निवडणुका आल्या की छत्रपती व माँ जिजाऊ यांची आठवण होते. राजकीय स्वार्थासाठीच महापुरुष सत्ताधाऱ्यांना हवे आहेत. आता सर्व मराठा समाज एकवटला आहे, आम्ही ओबीसीमध्येच आरक्षण घेणार आहोत. शांततेमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीने सर्वांना दिला आहे. त्यामुळे मुंबईला उपोषण करणार आहोत. शांततेचे आंदोलन शासन जर करू देणार नसेल, तर लोकशाही जिवंतच राहणार नाही. २० जानेवारीला मुंबईमध्ये जावून आंदोलन करण्यावर आपण ठाम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT