नांदेड : प्रवासी वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती घडवणाऱ्या वंदे भारत या जलदगती रेल्वे गाडीच्या मार्गात हुजूरसाहेब नांदेड रेल्वे स्थानक जोडावे, अशी मागणी महाराष्ट्र शीख असोसिएशन मुंबईतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शीख असोसिएशन मुंबईचे समन्वयक मलकीत सिंग बल यांचया नेतृत्वात एका शिष्टमंडळाने नुकतेच केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतवीर सिंग उपस्थित होते.
सध्या वंदे भारत रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या प्रमुख केंद्रांना जोड़ण्याचे कार्य प्रगतिपथावर आहे. देशातील अनेक धार्मिक स्थळांना वंदे भारतच्या मागनि जोडण्यात येत आहे. नांदेड येथील सचखंड श्री हुजुरसाहेब या तीर्थस्थळाला लाखोंच्या संख्येत भाविक भेट देतात. वंदे भारतच्या मार्गात नांदेडचा समावेश केला गेला, तर भाविकांना आणि मराठवाडयातील नागरिक तथा प्रवासी यांना त्याचा लाभ मिळेल.
दरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सदर मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती, महाराष्ट्र शीख असोसिएशनचे सरदार दरजीत सिंग आणि मालकितसिंग बल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
वंदे भारत रेल्वेला नांदेड जोडले, तर वाहतूक क्षेत्रात क्रांती घडून येईल. यामुळे नांदेड ते मुंबई प्रवास सहा तासांत पूर्ण होऊ शकेल. तसेच शिर्डी आणि इतर धार्मिक क्षेत्रांच्या दर्शनासाठी भाविकांना सोयी उपलब्ध होतील. याशिवाय मराठवाड्यातील प्रवासी तथा व्यापाऱ्यांना कमी वेळात अंतर पूर्ण करता येईल. वदे भारतमुळे नांदेड ते अमृतसर १६ तासांत गाठणे शक्य होईल. तसेच दक्षित राज्यातील मोठ्या महानगरांना एका दिवसात भेट देणेही शक्य होणार आहे. शिवाय कोलकाता व पूर्वोत्तर राज्यांना कमी वेळात पोहोचणे शक्य होईल.