बिलोली : तब्बल ११ क्विंटल २७ किलो गांजाची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी बिलोली येथील मा. जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुंडार यांनी दोन आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणातील आरोपी गोकुळ नारायण राजपुत (वय ३२, रा. होणाजीवाडी, ता. पैठण, जि. संभाजीनगर) आणि सुनील यादव महाजन (वय ३५, रा. निजामाता शाळा, इरंडोल, ता. इरंडोल, जि. जळगाव) यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क), २०(ब), (२)(क), २५ व २९ नुसार गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, स्वापक नियंत्रण ब्युरो, मुंबई विभागात कार्यरत तत्कालीन विभागीय पोलीस अधिकारी समीर वानखेडे यांना दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार पो.स्टे. नायगाव हद्दीतील मौजे गडगा ते कन्हाळा रोडवर मांजरम गावच्या रोडवर असलेल्या महामार्गी बौद्ध विहाराच्या रोडवर सापळा रचण्यात आला.
यावेळी विनापरवाना व बेकायदेशीररित्या कोणताही परवाना नसताना ट्रक क्रमांक एमएच २६ एडी २१६५ मध्ये तब्बल ११ क्विंटल २७ किलो गांजा विशाखापट्टणम ते जळगाव असा वाहतूक करताना आरोपी आढळून आले. दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ५.४५ वाजता पथकाने छापा मारला असता हा गांजा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी स्वापक नियंत्रण ब्युरो, मुंबई विभागातील वरिष्ठ अधिकारी अमोल मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे नायगाव येथे गु.र.नं. १८/२०२१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा संपूर्ण तपास करून तपासी अंमलदार विठ्ठल पवार यांनी तपासाअंती गुन्ह्याचे दोषारोपपत्र बिलोली येथील मा. अतिरिक्त सत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.
न्यायालयासमोर आलेल्या साक्षी-पुराव्याचा विचार करून तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. न्यायाधीश आर. व्ही. हुंडार यांनी आरोपी गोकुळ नारायण राजपुत व सुनील यादव महाजन यांना दोषी ठरवत वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.
सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. संदीप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. जयेश संदीप अग्रवाल, ॲड. योगेश सतीश पुंड तसेच पैरवी कर्मचारी एच.एन. सुगावे, ए.एस.आय. नायगाव, शेख इम्रान शेख मन्सूर, क. लिपिक आणि पो. ह. ७३७ महेंद्र दासरवार, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नांदेड यांनी सहकार्य केले. ११ क्विंटलपेक्षा अधिक गांजाच्या या मोठ्या कारवाईनंतर न्यायालयाने दिलेल्या कठोर शिक्षेमुळे अमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.