Farmers affected by the Nanded-Jalna Samruddhi Highway to stage 'Rasta Roko' on Thursday
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : महामार्गावरील अतिरिक्त जमीन संपादन करण्यासाठी बजावलेल्या नोटीसा शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशान्वये रद्द केल्यानंतरही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या महामार्गावरील अतिरिक्त जमीन संपादनाची प्रक्रिया पुन्हा सुरु केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी येत्या गुरुवारी रास्ता रोको आंदलन पुकारले आहे.
चुकीचे मूल्यांकन, व्याजाची थकीत रक्कम, बाजारभावाप्रमाणे जमिनीचा मावेजा यासह इतर अनेक प्रलंबित मागण्या मान्य झाल्याशिवाय पुन्हा जमीन संपादित होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका नांदेड-जालना समृद्धी महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांनी घेतली होती. कृती समितीचे प्रमुख समन्वयक दासराव हंबर्डे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेवून त्यांना मागण्यांचे निवेदनही सादर केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कर्डिले यांनी तातडीने संबंधित अधिकारी व कृती समितीच्या शिष्टमंडळाची बैठक बोलावून पुढील आदेशापर्यंत जमीन संपादित करण्याची प्रक्रिया थांबविण्याच्या सूचना दिल्या होत्या.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून राज्य रस्ते विकास महामंडळाने या मार्गावरील अतिरिक्त जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरु केली असून काही शेतकऱ्यांच्या शेता हद्द निश्चित करणारे निशाणे रोवले आहेत. शिवाय या भागातील शेतात ड्रोनच्या साह्याने मोजणीची प्रक्रियाही सुरु केल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांचा विरोध असताना आणि अनेक प्रकरणे शासकीय, प्रशासकीय व न्यायालयीन दरबारी प्रलंबित असताना महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सुरु केलेली जमीन संपादनाची प्रक्रिया अन्यायकारक असून याविरुद्ध आता शेतकरी प्रचंड संतापले आहेत. बाबुळगाव फाटा येथे रविवारी सकाळी झालेल्या बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत या प्रक्रियेचा जाहीर निषेध करून येत्या गुरुवारी तुप्पा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय झाला.
सर्विस रोडसाठी अतिरिक्त जमीन संपादन करण्यास शेतकऱ्यांचा विरोध असून मागील मागण्या पूर्ण होईपर्यंत वेगवेगळे तीव्र आंदोलन करण्यात येतील, त्याचाच भाग म्हणून तुपा येते नांदेड-हैदराबाद रोडवर गुरुवारी आंदोलन करण्यात येणार आहे. बैठकीस प्रमुख समन्वयक दासराव हंबर्डे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी परदेशी बाबूजी, शिवाजी भालेराव अशोक मोरे, माजिद शेठ, संभाजी भालेराव, रामदास कदम, गजानन कदम, नवाब, संतोष भालेराव कांचनगिर, संतोष मस्के, ठाकूर पांगरेकर, साहेबराव फुले, हरेश्वर वडजे, अमोल कदम, मुंजाजी काकांडीकर, चंद्रकांत काकांडीकर, ज्ञानेश्वर वडजे, सुरेश मालेराव शिवार भालेराव यांच्यासह तुपा, काकांडी, बाबुळगाव, गुंडेगाव, पांगरी, विष्णुपुरी येथील बाधित शेतकरी उपस्थित होते.