विशेष प्रतिनिधी
नांदेड ः विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची जागा भाजपाला सुटल्याची अधिकृत घोषणा रविवारी झाल्यानंतर या पक्षात खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घडामोडींना वेग आला. भाजपाच्या अर्थात महायुतीच्या अधिकृत उमदेवाराचा अर्ज सोमवारी (दि.1) दाखल करण्यात येणार आहे. नांदेडमध्ये महायुतीत एकजूट राहणार का, ते मात्र 4 जून रोजी स्पष्ट होईल. दरम्यान, विरोधकांकडून सक्षम उमेदवार देण्याची तयारी सुरू झाली आहे.
महायुतीमध्ये 17 जागांच्या वाटपाचा तिढा शनिवारी रात्री सुटला. चर्चेच्या गु-हाळात नांदेडच्या जागेवरून वाद नव्हता, हे गेल्या आठवड्यात सांगितले गेले; पण स्थानिक पातळीवर भाजपा आणि अन्य दोन मित्रपक्षांत सारे काही आलबेल नसल्याचे दिसत होते. ते आता ठळक होत चालले आहे.
खा. अशोक चव्हाण शनिवारी सायंकाळी नांदेडमध्ये दाखल झाले. नांदेडची जागा भाजपाला सुटल्याचे जाहीर झाल्यानंतर रविवारी दुपारनंतर त्यांनी पुढील हालचाली सुरू केल्या. भाजपा आणि महायुतीतील प्रमुख स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन उमेदवाराचा अर्ज सोमवारी दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नांदेडच्या वरील मतदारसंघात भाजपा-मजपा तसेच त्यांच्या मित्रपक्षांच्या मतदारांचे संख्याबळ तीनशे पार असल्यामुळे निवडणुकीत विजय महायुतीच्या आवाक्यात दिसत असला, तरी दुसऱ्या बाजुला भाजपाच्या विरोधात एकच सक्षम उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू असल्यामुळे निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होईल, अशी चर्चा येथे सुरू झाली आहे.
महायुतीतील राष्ट्रवादीचे आमदार चिखलीकर यांनी ही जागा आपल्या पक्षाला सुटावी, यासाठी पक्ष नेतृत्वापर्यंत प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले नसले, तरी चिखलीकर हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत खा. अशोक चव्हाण यांच्यामुळे पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा तसेच भाजपात असलेल्या त्यांच्या कन्येला स्थानिक पातळीवर वाळीत टाकण्याच्या धोरणाचा वचपा काढण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील आणि खासदार नागेश आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा या दोघांनी गेल्या आठवड्यामध्ये अर्ज दाखल केले. त्यांच्यातून एक जण विरोधी पक्षांचा उमेदवार होऊ शकतो. चिखलीकर यांनी भाजपाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली तर त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी तयारी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दर्शविली असल्याचे समोर आले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सोमवारी दुपारी 3 वाजता संपणार आहे.
विधान परिषद निवडणुकीत भाजपा किंवा शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणी बंडखोरी करू नये, यासाठी पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसांनी एक मोघम पत्र जारी केले. पक्षातर्फे किंवा अपक्ष म्हणून कोणीही उमेदवारी अर्ज भरू नये, असे त्यात म्हटले असले, तरी नांदेडमध्ये प्रवीण पाटील चिखलीकर यांनी वरील पत्र जारी होण्यापूर्वीच अर्ज भरला आहे.