नांदेड महानगरातील कार्यक्रमांतून प्रसिद्धी मिळविण्याचा भाजपा जिल्हाध्यक्षांचा खटाटोप ! File Photo
नांदेड

नांदेड महानगरातील कार्यक्रमांतून प्रसिद्धी मिळविण्याचा भाजपा जिल्हाध्यक्षांचा खटाटोप !

भारतीय जनता पक्षाला नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण असे दोन जिल्हाध्यक्ष लाभलेले असताना दोन्ही विभागात पक्ष संघटन वाढण्याऐवजी संघटनेची घसरगुंडी सुरू असल्याचे दिसत आहे.

पुढारी वृत्तसेवा

BJP District President's Strenuous Effort to Gain Publicity Through Events in Nanded City!

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाला नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण असे दोन जिल्हाध्यक्ष लाभलेले असताना दोन्ही विभागात पक्ष संघटन वाढण्याऐवजी संघटनेची घसरगुंडी सुरू असल्याचे दिसत आहे. दोन्ही जिल्हाध्यक्षांची कार्यपद्धती केवळ नांदेड महानगरापुरतीच मर्यादित आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून महानगरातील कार्यक्रमांना उपस्थिती लावण्याचे सोपस्कार पूर्ण करण्यात जिल्हाध्यक्ष धन्यता मानत आहेत.

जिल्ह्यात भाजपा संघटन वाढीसाठी पक्षश्रेष्ठींचे वेळोवेळी आदेश असतात. कार्यक्रमांची रुपरेषाही ठरवून दिली जाते; परंतु ग्रामीण भागात पक्षाचे कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी नांदेड महानगर कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमांनाच हजेरी लावून समाज माध्यमाद्वारे प्रसिद्धी मिळविण्यात दोन्ही जिल्हाध्यक्षांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते.

काही दिवसांपूर्वी पक्षाच्यावतीने दीनदयाळ उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण अभियान राबविण्यात आले होते; परंतु नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या विभागात जिल्हाध्यक्षांची उदासीनता पहायला मिळाली. प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण अभियान राबविणे गरजेचे असताना काही मोजक्या तालुक्यात व बोटांवर मोजण्याइतक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे अभियान राबविण्यात आले. त्यामुळे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याबाबत तीव्र रोष व्यक्त केला होता.

६ एप्रिल रोजी पक्ष स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला नांदेड दक्षिण कार्यालयापेक्षा नांदेड महानगर कार्यालयात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे नांदेड दक्षिण भाजपा कार्यालय शहरात थाटण्यात अनेक ससमस्यांचा सामना करावा आल्यामुळे ग्रामीण कार्यकर्त्यांना लागत आहे. नांदेड उत्तर विभागात भाजपा अस्तित्वात आहे की नाही? हा प्रश्न निर्माण होत आहे.

दोन्ही जिल्हाध्यक्षांचे कार्यक्षेत्र ग्रामीण विभाग असतानाही ग्रामीण कार्यकर्त्यांशी संवाद, समन्वय आणि संपर्क नसल्यामुळे कार्यकर्ते उदास आणि नैराश्यग्रस्त झाल्याची चर्चा आहे. परिणामी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली मरगळ पक्षवाढीसाठी अडचण ठरत आहे.

संघटन मजबूत करण्याची गरज

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आतापासूनच कार्यकर्त्यांना कामाला लावण्याची गरज आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन संघटन मजबूत करावे लागणार आहे. नांदेड महानगर कार्यालयातील कार्यक्रमांना उपस्थिती लावून प्रसिद्ध मिळविण्याचा खटाटोप थांबवावा लागेल..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT