Marathwada Water Storage : मराठवाड्यातील सर्व जलाशयांत यंदा शंभर टक्के जलसाठा File Photo
नांदेड

Marathwada Water Storage : मराठवाड्यातील सर्व जलाशयांत यंदा शंभर टक्के जलसाठा

पाऊस सुरूच : जायकवाडी धरणासह विष्णुपुरी प्रकल्पातून अद्याप विसर्ग

पुढारी वृत्तसेवा

All reservoirs in Marathwada have 100 percent water storage this year

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: ऑक्टोबर महिन्याचा आजचा शेवटचा दिवस. तरीही पाऊस सुरूच आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत ३५ टके पाऊस अधिक पडला. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धरणं शंभर टक्के भरून वाहात आहेत. जायकवाडी, माजलगाव या मोठ्या धरणांसह विष्णुपुरी प्रकल्पातून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाचे प्रमाण पाहता पुढील तीन महिने शेतीसाठी पाण्याचा उपसा करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती नाही.

यावर्षी मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. मान्सूनपूर्व पाऊससुद्धा चांगला झाला. जूनमध्ये मृगाचे आगमन झाल्यानंतर पुढील सुमारे अडीच महिने ठराविक अंतराने पाऊस पडत गेला. ऑगस्टच्या मध्यापासून मात्र पावसाने जो जोर पकडला तो सप्टेंबर अखेरपर्यंत कायम होता. या कालावधीत अनेकवेळा बहुतेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. दोन वेळा पूर सुद्धा येऊन गेले. ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस पडतो आहे. काही तज्ज्ञांच्या मते तर नोव्हेंबर महिन्यातही पाऊस पडेल.

ऑक्टोबर महिन्याचा अखेरचा दिवस आज आहे. यावेळी गोदावरी नदीवरील मराठवाड्यातील जायकवाडीपासून धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्यापर्यंतचे सर्व जलाशय शंभर टक्के भरलेले आहेत. गुरुवारी (दि. ३०) जायकवाडीचे १८ दरवाजे ०.३ मीटरने उघडे होते, त्यातून ६८.८२८ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आजवर या धरणातून ४ हजार ५९२.७६१ दशलक्ष घनमीटर पाणी सोडून देण्यात आले. माजलगाव धरणाच्या एका दरवाजातून ६.५५३ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. येलदरी शंभर टके भरलेले आहे. या धरणाच्या तीन दरवाजातून १०.३२४ दलघमी विसर्ग करण्यात येत आहे.

सिद्धेश्वर धरणाचे १० दरवाजे ०.३० मीटरने उघडे आहेत. त्यातून २०.१२० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणातून आजवर १५४४.४७३ दशलक्ष घनमीटर पाणी वाहून गेले. मानार नदीवरील अपर मानार व लोअर मानार ही दोन्ही जलाशय शंभर टक्के भरलेली आहेत. लोअर मानार अर्थात बारुळ धरणातून अजूनही विसर्ग सुरू असून वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील इसापूर धरणसुद्धा शंभर टक्के भरलेले आहे.

या धरणाचे ५ दरवाजे उघडे असून त्यातून १.०४४ दलघमी पाण्याचा विसर्ग होत आहे. आजवर येथून १६११.५९० दशलक्ष घनमीटर पाणी सोडून देण्यात आले. विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरील भागात असलेले ढालेगाव, तरुगव्हाण, मुदगल, मुळी, दिग्रस व अंतेश्वर हे सर्व बंधारे पूर्णपणे भरलेले असून सर्वच ठिकाणाहून विसर्ग सुरू आहे. हे पाणी विष्णुपरी प्रकल्पात येत असल्याने आणि अद्याप पाऊस सुरु असल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा मागील अनेक दिवसांपासून उघडा आहे. गुरुवारी या धरणातून ७४.८७० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू होता. आजवर या धरणातून ११ हजार २७.३०० दशलक्ष घनमीटर पाणी सोडून देण्यात आले.

बाभळीतून २३ हजार दशलक्ष घनमीटर पाणी वाहून गेले : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दि. २९ ऑक्टोबरपर्यंत बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे उघडे ठेवावे लागतात. जेमतेम पावणे तीन टी. एम. सी. क्षमतेच्या बाभळी बंधाऱ्यातून यंदा ३० ऑक्टोबरपर्यंत २३ हजार ४८४.२१३ दशलक्ष घनमीटर पाणी वाहून गेले. पावसाचे प्रमाण व वरच्या भागातून येणारा येवा लक्षात घेता नोव्हेंबरमध्येसुद्धा या बंधाऱ्यातून विसर्ग करावा लागेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT