नांदेड, पुढारी वृत्तसेवा : ६ एप्रिल २००६ रोजी नांदेडच्या पाटबंधारे नगर इथे राजकोंडवार यांच्या घरी मोठा स्फोट झाला होता. या प्रकरणी १३ जणांविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा आता तब्बल १९ वर्षांनी निकाल लागला असून सर्व १३ आरोपींची नांदेड न्यायालयाने शनिवारी (दि .४) निर्दोष मुक्तता केली. नांदेड न्यायालयाच्या या निर्णयाने सीबीआयला मोठा दणका दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ६ एप्रिल २००६ रोजी नांदेडच्या पाटबंधारे नगर इथे राजकोंडवार यांच्या घरी एक मोठा स्फोट झाला होता. यात नरेश राजकोंडवार आणि हिमांशू पानसे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर अन्य तिघे जखमी झाले होते. हा स्फोट बॉम्बचा होता असा आरोप करत हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग करण्यात आला. या प्रकरणात एकूण १३ आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये खटला दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरुवातीला नांदेड पोलीस, त्यानंतर एटीएस, त्यानंतर सीबीआयने केला. यातील काही आरोपींवर जालना, परभणी आणि मालेगाव इथल्या स्फोट प्रकरणातही आरोपी करण्यात आले होते. १९ वर्षात या खटल्यात एकूण ४९ साक्षीदार तपासण्यात आले. अखेर आज (दि.४ जानेवारी) नांदेड न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले.
हा स्फोट कथितपणे बाँबस्फोट बनवण्याच्या प्रक्रियेत झाला होता, ज्यात बजरंग दल आणि आरएसएसशी संबंधित लक्ष्मण राज कोंडवार यांचा मुलगा नरेश राज कोंडवार आणि त्याचा साथीदार हिमांशू पांसे ठार झाले. या घटनेत आणखी चार जण जखमी झाले होते, ज्यामध्ये मारुती केशव वाघ, योगेश देशपांडे (उर्फ वडोलकर), गुरु राज टोपटीवार आणि राहुल पांडे यांचा समावेश आहे.
या स्फोटानंतर सुरुवातीला हा प्रकार फटाक्यांचा स्फोट असल्याचे सांगून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. परंतु दुसऱ्या दिवशी घराची झडती घेताना जिवंत बाँब सापडल्यानंतर पोलिस आणि तपास यंत्रणांनी याला बाँबस्फोट मानले. झडतीदरम्यान आरोपींच्या घरातून मुस्लिम पोशाख, खोट्या दाढ्या आणि टोप्याही सापडल्या. या प्रकरणाची सुरुवातीची चौकशी स्थानिक पोलिसांनी केली, त्यानंतर प्रकरण एटीएसकडे सुपूर्द करण्यात आला होता. या प्रकरणी अखेर १९ वर्षांनी निकाल लागला असून, सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.