60,000 Farmers Across Three Talukas Deprived of Crop Insurance
नरेंद्र येरावार
उमरी, धर्माबाद आणि नायगाव तालुक्यातील तब्बल ६० हजार शेतकरी पीकविम्यापासून वंचित असून वेळोवेळी अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारची मदत कधी मिळणार? याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला सरकार किंवा पीकविमा कंपनीला वेळ नसल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आता पुन्हा एकदा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन उभारावे लागणार असल्याचा इशारा डॉ. भगवान मनुरकर यांनी दिला आहे.
उमरी धर्माबाद आणि नायगाव तालुक्यातील जवळपास ६० हजार शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. उमरी तालुक्यातील धानोरा, सिंधी, धर्माबाद तालुक्यांतील करखेली, जारीकोट, शिरजखोड, नायगाव तालुक्यातील कुंटूर, बरबडा, मांजरम, नरसी आणि नायगाव या सर्कलमधील शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. एकूण ९३ पोर्टल पैकी ७१ पोर्टलवर शेतकऱ्यांच्या नावाने पैसे दाखवत आहेत. त्यातच २२ पोर्टलवर पैसे दाखवतच नाहीत.
विशेष म्हणजे पोर्टलला पैसे दाखवत असले तरी शेतकऱ्याच्या खात्यात एकही रुपया जमा झाला नाही. त्यामुळे लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे होणार नाही! पीकविमा कंपनी आणि सरकार हे शेतकऱ्यांना वेळोवेळी आश्वासन देऊन उपाशी ठेवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
त्यामुळे पीकविमा कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनुरकर यांनी दिला आहे. पीकविमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी आपले पैसे भरले. परंतु सरकारची मदत जाहीर होऊनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. पीकविमा मंजूर झाला. परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही.
या संदर्भात पालकमंत्री अतुल सावे यांच्याशी डॉ. मनुरकर यांनी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी केली. दरम्यान, विमा कंपनीला लोकप्रतिनिधींनी धारेवर धरून शेतकऱ्यांना मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. वर्ष २०२५-२०२६ खरिपाचा सोयाबीनचा पीकविमा मंजूर झाला. आदेश निघाले, पीक पाहणी प्रयोग झाला. याला पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे.
आज ना उद्या पैसे मिळतील या आशेवर बळीराजा आहे. परंतु, शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पैसे मिळाले नाहीत. ही शोकांतिका आहे. यंदा अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. वेळोवेळी अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीने शेतकऱ्यांची स्वप्ने मातीमोल झाली. एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही आणि दुसरीकडे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अक्षरशः कोलमडला आहे.