नांदेड / हिमायतनगर : पुढारी वृत्तसेवा तेलंगणा राज्यातील ग्राम चातारा मंडल कुंटाला, जिल्हा निर्मल येथील नातेवाईकांच्या घरातील कार्यक्रम आटोपून परतनाऱ्या गोरक्षकांना बोलेरो पिकअप गाडीतून काही लोक गुरांना वाहनात डांबून नेत असल्याचे दिसले. किनवट तालुक्यातील अप्पाराव पेठ परिसरात येताच गोरक्षकांना संशय आल्याने त्यांनी गायींसह गुरांची सुटका करण्यासाठी वाहनाचा पाठलाग केला. वाहन थांबत नसल्याचे पाहून गाडी आडवी लावून गाडी थांबवली. यावेळी गायी नेणाऱ्या लोकांनी गोरक्षकांवरच हल्ला केला. या हल्ल्यात एकजण जागीच गतप्राण झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. तर अन्य दोन किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारांसाठी नांदेडला रवाना करण्यात आले आहे. मारेकरी अंधाराचा फायदा घेत त्याच वाहनातून तेलंगणा राज्यात पसार झाले. हि घटना दि.२० च्या मध्यरात्री १२:३० वाजण्याच्या दरम्यान तेलंगणा राज्यातील कुंटालाकडे जाणाऱ्या मलकजाम मार्गावर घडली.
दि. २० मंगळवारी रात्री किनवट तालुक्यातील आपाराव पेट परिसरात बोलेरो पिकअप वाहणातून गाई नेत असतांना याच मार्गावर टि.एस.१८ एफ ८४६९ इरटीका कार मधून चिखली येथील शेखर रामलु रापेल्ली, जिल्हा गोरक्षा प्रमुख किनवट महेश कोंडलवाड, ज्ञानेश्वर कार्लेवाड, विशाल चिनन्ना मेंडेवाड, विठ्ठल लक्ष्मण अनंतवार, बालाजी राऊलवाड हे सर्वजण तेलंगाणा राज्यातील ग्राम चातारा मंडल कुटाला जिल्हा निर्मल येथिल नातेवाईकां कडील कार्यक्रम आटोपुन परतीच्या प्रवासात होते. दरम्यान त्यांना गायी भरून असलेले बोलेरो पिकअप वाहन जात असल्याचे लक्षात आले. सदरचे वाहन थांबवण्यासाठी त्यांनी वाहनाचा पाठलाग केला, परंतु सदर वाहन थांबत नसल्याने कुंटला – मलकजाम मार्गावरील पुलावर कार आडवी लावुन बोलेरो पिकअप गाडी थांबवुन विचारपुस केली.
यावेळी जनावरे आहेत का ते पहाण्यासाठी गेलेल्या गोरक्षकावर बोलेरो पिकअप वाहनातुन आलेल्या लोकांनी लाठ्या, काठ्या चाकू घेवुन सशस्त्र हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी गोरक्षकांवर सपासप वार केले. या भ्याड हल्ल्यात चिखली ता.किनवट येथील शेखर रामलु रापेल्ली (वय ३०) हे गंभीर जख्मी होवुन काही अंतरावर जावुन खाली पडले, तर जिल्हा गोरक्षा प्रमुख किनवट महेश कोंडलवाड, ज्ञानेश्वर कार्लेवाड, विशाल चिनन्ना मेंडेवाड, विठ्ठल लक्ष्मण अनंतवार हे चौघेजण गंभीर जख्मी झाले. बालाजी राऊलवाड, सुर्यकांत कार्लेवाड हे किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान मारेकऱ्यांनी इरटीका कारचेही नुकसान केले.
सर्वांना शिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ आणले असता, शेखर रामलु रापेल्ली यांची तपासणी करून वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले.
मृत रापेल्ली यांचे शव रात्री पासुन शिवणी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात असुन, जखमींवर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत तेलंगाणा राज्यात बोलेरो पिकअप वाहनासह पसार झाले.
या घटनेची नोंद इस्लापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सोपान रेड्डी पेंटेवार यांनी दिलेल्या फिर्यादिवरून अज्ञात १२ ते १५ मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इस्लापूर पोलिस करीत आहेत.
या घटनेमुळे गोरक्षक व हिंदु बांधवातून संताप व्यक्त केला जात आहे. गुन्हयाचा तपास जलद गतीने करून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करणे पोलिसांसमोर मोठ आव्हान आहे.
दि. १७ शनिवारी विश्वहिंदु परीषदेचे जिल्हा मंत्री गोरक्षक किरण बिच्चेवार यांनी हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथे जनावरे नेताना वाहन पकडले होते. त्यावेळी १४ ते १५ जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु वेळीच पोलिस वाहन पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेची तीव्रता पाहता प्रत्येक गोरक्षकास पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी बिच्चेवार यांनी पुढारीशी बोलतांना केली आहे.
हेही वाचा :