विठ्ठल कटके
रेणापूर : उन्हापासून बचाव करण्यासाठी शीतपेये किंवा रसाळ फळांचा वापर केला जातो. त्यात टरबुजाला सर्वाधिक मागणी असते. परंतु मुंबईच्या भेंडी बाजार परिसरातील त्या घटनेनंतर झडत असलेल्या चर्चांमुळे टरबूज खावे की नाही हा संभ्रम सर्वसाम्यांमध्ये निर्माण झाला असून टरबूज घेण्यासाठी रेणापूरच्या आठवडी बाजारात ग्राहकांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचे दिसत होते. टरबुजाची मागणी घटल्यामुळे शेतकरी व व्यापारी आर्थिक अडचणीत आले आहेत. टरबुजा ऐवजी आंब्याला अधिक पसंती दिली जात आहे.
उन्हापासून बचाव करण्यासाठी टरबुज , खरबुज , संत्री , अननस व इतर फळे खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. सध्या आंब्याचे सिजन असल्यामुळे रेणापूरच्या आठवडी बाजारात आंब्यांचीही आवक वाढत आहे. टरबुज वगळता इतर रसाळ फळांची आवक कमी होत आहे. व्यापारी हे प्रत्यक्ष शेतावर जाऊन टरबुजाची खरेदी करतात.
बाजारात टरबुज विकायला शेतकऱ्यांना वेळ नसतो त्यामुळे शेतकरी जाग्यावरच टरबुज विक्री करतात. कमी दिवसात येणारे हंगामी पीक म्हणून टरबुजाकडे पाहिले जाते. या वर्षी तालुक्यात टरबुजाचे उत्पादन अधिक झाल्याने याला भावही तसा कमीच आहे. त्यात मुबंईतील त्या घटनेनेतर अफवांचे पेव फुटले आहे त्यामुळे टरबुज खानेच टाळले जात आहे. याचा शेतकरी व व्यापाऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या वर्षी खर्चही पदरात पडतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
गल्लो- गल्ली फिरून टरबुज विक्री करतांना दिसत आहेत. तालुक्यात टरबुज व खरबुजाची लागवड तशी फारच कमी होती. ज्यां शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे असेच कांही मोजके शेतकरी याची लागवड करीत होते. परंतु आता या क्षेत्रात मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. या पुर्वी व्यापारी परजिल्ह्यातुन अशी फळे खरेदी करून आणत. त्यामुळे ती महाग मिळायची आता ती परिस्थिती राहिली नाही.
नव नविन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध फळांची लागवड शेतकरी करीत आहेत. दहा - बारा वर्षांपूर्वी परदेशात सर्वाधिक द्राक्षाची निर्यात करणारा तालुका म्हणून रेणापूर तालुक्याची ओळख होती. त्यातून तालुक्याला दोन अडीचशे कोटीचे परकिय चलन मिळत होते.
किमान दीड -दोनशे हेक्टरवर द्राक्षांच्या बागा होत्या. परंतु हे चित्र एकदम पालटून गेले आहे. निसर्गाची अवकृपा , पाण्याची व मजुरांची कमतरता , खते व कीडनाशके यांचे वाढलेले दर या व इतर अनेक कारणांमुळे आज तालुक्यात द्राक्षाची लागवड शुन्यावर आली आहे.
शुक्रवारी रेणापूरचा आठवडी बाजार भरला होता. या बाजारात सर्वच भाजीपाल्याचे भाव सर्वात खालच्या पातळीवर आले होते. एकेकाळी भाव खानाऱ्या कोथींबीरला तर भावच नसल्याने कांही शेतकऱ्यांना चक्क ती बाजारात टाकून दिली होती. गवार व हिरव्या मिरचीलाच काय तो 40 रुपये प्रति किलो दर मिळाला तर वांगी , मेथी , पालक , काकडी , टोमॅटो यासह इतर भाजीपाल्याचे दर प्रति किलो 5 ते 10 रुपयेच होते. बाजारात मात्र टरबुजाचे ढिगच ढिग लागले होते.