आमदार अमित देशमुख pudhari photo
लातूर

Latur political News : लातूरच्या राजकीय संस्कृतीला आता आत्मपरीक्षणाची गरज

माजी केंद्रीय मंत्री स्व. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकावरून काँग्रेस व भाजपात सुरू झालेल्या वादाच्या निमित्ताने लातूरच्या राजकीय संस्कृतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

लातूर : शहाजी पवार

राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतच असतात पण त्यांची भाषा आणि पातळी जेव्हा सार्वजनिक जीवनाच्या मर्यादा ओलांडते तेव्हा चर्चा केवळ राजकीय राहत नाही. माजी केंद्रीय मंत्री स्व. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकावरून काँग्रेस व भाजपात सुरू झालेल्या वादाच्या निमित्ताने लातूरच्या राजकीय संस्कृतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपाने लातूर शहरात आंदोलन केले त्यात लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांच्याविषयी केलेली घोषणाबाजी आक्षेपार्ह होती. त्यावरुन भाजपला लक्ष्य केले जात आहे. आक्षेपार्ह घोषणा निश्चितच समर्थनीय नाही. मात्र त्याचवेळी २०२४ च्या लातूर शहर विधानसभा निवडणूक प्रचारात विरोधी उमेदवाराबाबत आ. अमित देशमुखांकरवी झालेल्या वैयक्तिक वक्तव्यांकडे दुर्लक्ष कसे करता येईल ?, असा प्रतिप्रश्नही उपस्थित होत आहे.

राजकीय सभ्यतेचे मापदंड परिस्थितीनुसार बदलत असतील तर ‘सभ्यता’ची व्याख्याच संशयाच्या भोवऱ्यात येते.लातूरच्या राजकारणात एकेकाळी वैचारिक संघर्षाला महत्त्व होते. आज मात्र व्यक्तिकेंद्री टीका, आक्रमक भाषा आणि परस्परांना नामोहरम करण्याची स्पर्धा वाढत आहे. आज लातूर शहराच्या सार्वजनिक वातावरणावर परिणाम करणारे अनेक विषय आहेत.

आम लातूरकरांना त्याची चिंता आहे मात्र त्यावर चिंतन करण्यात इथल्या राजकारण्यांना रस नाही. खरे तर शहराला आव्हान ठरलेल्या विषयांवर चर्चा होणे, ते मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी व धोरणकर्त्यांनी गंभीर होणे आणि त्यासाठी रात्रीचा दिवस करणे ही लातुरसाठी काळाजी गरज बनली आहे. मात्र अनिवार्य असणाऱ्या या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याची खदखद नागरिकांमधून व्यक्त होत आहे. ‘कोणी आधी केले?’ याचा हिशेब मांडण्यापेक्षा ‘आपण पुढे काय करणार?’ याचे उत्तर देण्याची आज खरी गरज आहे .

दुसऱ्याने मर्यादा ओलांडली म्हणून आपणही त्या ओलांडायच्या, हा राजकारणाचा नियम होऊ शकत नाही, याचेभानही आंदोलनकर्त्यांनी ऱाखायला हवे. लातूरची राजकीय परंपरा जपण्याची जबाबदारी कोणत्याही एका पक्षाची वा व्यक्तीची नाही. सत्तेत असो वा विरोधात - प्रत्येकांनी स्वतःच्या कृतीकडेही तेवढ्याच कठोरतेने पाहिले पाहिजे. जनाचे नको वाटत असेल तर मनाचे तरी भान ठेवण्याची वेळ आली आहे पण हे कळण्यासाठी किती काळ जाईल तोवर कोणती वेळ येईल हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT