Risking one's life for food; Chhattisgarh's Nat family wanders across Maharashtra for food
संग्राम वाघमारे
चाकूर : पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक जीवघेण्या प्रसंगाना सामोरे जाण्याची वेळ आजही कित्येक कुटुंबावर आली आहे. जीव धोक्यात घालून दोरीवरील कसरती करणाऱ्या एका चिमुकलीकडे पाहून चाकुरातील अनेकांचे डोळे पाणावले आहे. रविवारी चाकूरातील जुन्या बसस्टॅन्डला उन्हात रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या दोन काठ्यांमध्ये बांधलेल्या एका सडपातळ दोरीवर आरती नट नावाची बिलासपूर छत्तीसगड येथील लहान चिमुकली निश्चल उभी आहे, डोळ्यांवर काळा चष्मा, अंगावर रंगीबेरंगी पोशाख, हातात संतुलन साधण्यासाठी काठी आणि खाली चिंताग्रस्त नजरेने उभी असलेली तिची आई या दोघीही पोटासाठी जीवघेणी झुंज करताना पाहायला मिळाल्या. लोक चारही बाजूने त्यांचा खेळ पाहण्यात मग्न होती.
अजून खेळायच्या वाढायच्या वयात असलेली आरती नट ही वडीलांचा मृत्यू झाल्यानंतर रोजच्या उदरनिर्वाहासाठी बिलासपूर छत्तीसगडहून संपूर्ण महाराष्ट्रात आई, भाऊ आणि बहिणीसोबत भटकंती करते. आकाशातल्या दोरीवर ती जीवाची बाजी लावते. पाहणारे थांबतात, टाळ्या वाजवतात, कुणी दोन-चार रुपये हातात ठेवतात आणि त्याच पैशांवर या कुटुंबाचा चुल पेटते.
दोरीवर चालताना तिचा प्रत्येक पाऊल म्हणजे मृत्यूशी दोन हात करण्यासारखा प्रसंग असतो. खाली ना जाळी, ना सुरक्षिततेची साधने, फक्त धाडस, सराव आणि जगण्याची तीव्र इच्छा मनामध्ये असते. संतुलन ढळलं तर जीव धोक्यात हे कळत असतानाही पोटासाठी संतुलन राखणं भाग आहे. आई खाली उभी राहन प्रत्येक क्षण काळजीने पाहते. तिच्या डोळ्यांत अभिमानही आहे, पण त्याहून मोठी आहे असहाय्यता, शिक्षण, सुरक्षित बालपण, स्वप्नं या सगळ्या गोष्टी जणू या दोरीवरच अडकून पडल्या आहेत.
एका गावातून दुसऱ्या गावात त्यांचा नित्यक्रम ठरलेला. दिवसभर अनेक ठिकाणी खेळ करायचा आणि त्यातून मिळालेले २५० ते ३०० रुपयांत आपल्या कुटुंबाची उपजीविका भगवण्यातच त्यांना समाधान असते. त्यांचे आयुष्य आणि भवितव्य दोरीवरच टांगलेले पाहायला मिळते.
डोक्यावर आकाशाचे छत आणि खाली जमिनीची छाया हेच त्यांचे सर्वस्व. ही केवळ आरती नट या एका कुटुंबाची कहाणी नाही; ही समाजाच्या विवंचनेची वेदनादायक वस्तुस्थिती आहे. आजही अनेक भटक्या व गरजू कुटुंबांना उपजीविकेसाठी अशा जीवघेण्या कसरती कराव्या लागतात. बालपण हातातून निसटत असताना आपण केवळ प्रेक्षक बनून राहणार का ? असा भावनिक सवाल उपस्थितनागरिकांकडून केला जात आहे.