Naam Foundation's initiative to help flood victims
लातूर, पुढारी वृतसेवा जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे, शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची गुरे, शेती औजारे वाहून गेली आहेत. घरे पडली आहेत. घरांत पाणी शिरल्याने अन्नधान्यासह संसारोपयोगी वस्तूही वाहून गेल्या आहेत. संकटाच्या या काळात नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी पूरग्रस्तांना आधार देण्याचे काम सुरू केले असून लातूर जिल्ह्यातील गरजूंना अन्नधान्यांचे सुमारे एक हजार किट वाटप करण्यात आले आहेत.
पहिल्या टप्प्यात फाऊंडेशनने लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ, साकोळ, धनेगाव, वडवळ, निलंगा, तळीखेड, काटेजवळगा, इनामवाडी, बिरवली, भुसणी यांसह अनेक गावांमध्ये जाऊन किराणा किटचे वाटप केले आहे. या किट्समध्ये तांदूळ, डाळ, तेल, मसाले, चहा-साखर अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे, ज्यामुळे गरजूंना आधार व दिलासा मिळाला आहे. नाम फाऊंडेशनचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन थेट लाभार्थ्यांच्या हातात मदतीचे साहित्य पोहोचवत आहेत.
या कार्यक्रमात जिल्हा समन्वयक विलास चामे, डॉ. हर्षवर्धन राऊत विश्वनाथ खंदाडे, ज्ञानेश्वर चेवले, रामलिंग शेरे, जयंत पाटील, विठ्ठल बोयणे, प्रमोद घायाळ आणि संस्थेचे अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या, धीर दिला आणि परिस्थितीबाबत माहिती घेतली. संकटाची व्याप्ती मोठी असून शेतकरी व अतिवृष्टी बाधितांना आधार देण्यासाठी दशदिशांनी मदत येणे गरजेचे आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी केले आहे.
नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हिंमत सोडू नये असे सांगत आम्ही आपल्यासोबत आहोत असा विश्वास व्यक्त केला आहे. कठीण प्रसंगात नामकडून मिळालेली मदत पूरग्रस्तांसाठी मोठा दिलासा ठरली असून या बांधिलकीने मानवतेचा वस्तुपाठ ऊजळ केला आहे. संकटाच्या काळात आधार देणारी, सावली पुरवणारी एक मानवसेवी संस्था अशी नाम फाऊंडेशनची ओळख असून त्यांच्या या सेवाकार्याप्रति प्रशासनासह नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
या आपत्तीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, खरीप हातचे गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतजमिनी पेरणी योग्य करणे गरजेचे आहे. ती कशी व कशाने करावी? चाड्यावर मूठ कशी धरावी, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहेत. हे ओळखून नाम फाऊंडेशन शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी बियाणे देणार असून राने पेरणीयोग्य करण्यासाठी जमेल तसा हातभार लावणार असल्याचे नामच्या वतीने सांगण्यात आले.