तळणी : मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातील कानडी, लिंबखेडा येथील अधिकृत वाळू घाटाची बुधवार (ता. १८) रोजी मंठा तहसीलदार सुमन मोरे व पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड यांनी संयुक्त पाहणी केली. घाटावरील रॉयल्टी दर कमी करण्याबाबत वाहनधारकांनी केलेल्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेत प्रति ब्रास ५०० कपात करण्यात आली.
तहसीलदारांच्या पाहणी दरम्यान वाहनध-ारकांनी रॉयल्टीचा दर जास्त असल्याची तक्रार तहसीलदारांकडे केली होती. संबंधित लिलावध ारकाशी चर्चा करून दरात कपात करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. यामुळे वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
घाट परिसरात मोबाईल नेटवर्क नसल्याने रॉयल्टी पावती स्कॅन केल्यानंतर तयार होणारा इन्व्हॉईस वेळेवर मिळत नसल्याची समस्या समोर आली आहे. इन्व्हॉईस मिळण्यासाठी वाहनधारकांना नदीपात्रात तासन्तास थांबावे लागत असून वाहतूक खोळंबा होत आहे.
संबंधित वाळू काटा जिओ-फेन्सिंगमध्ये असल्याने इन्व्हॉईस फेन्सिंग क्षेत्रातच तयार होतो. मात्र तेथे नेटवर्क उपलब्ध नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. नेटवर्क उपलब्ध असलेल्या ठिकाणी फेन्सिंग करून इन्व्हॉईस व्यवस्था नदीकाठावर करण्याची मागणी लिलावधारकांनी तहसीलदारांकडे केली.
या संदर्भात तहसीलदार सुमन मोरे यांनी सांगितले की, नेटवर्क अडचणीबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले असून लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तहसीलदारांचया पाहणीदरम्यान एका वाहनचालकाने गाडी रस्त्यात उभी ठेवल्याने रॉयल्टी भरून वाहेर पडणाऱ्या वाहनांना अडचण निर्माण होती. त्यामुळे तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना हस्तक्षेप करावा लागला.
दिलासा अन् प्रश्न
वाहनधारकांना दर कपातीतून दिलासा मिळाला असला तरी इन्व्हॉईस व नेटवर्कचा प्रश्न निकाली न लागल्यास घाटावरील कामकाज सुरळीत होणे कठीण होणार असल्याची प्रतिक्रिया वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.