मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्‍यासोबत चर्चा करताना आ. अब्‍दुल सत्तार. pudhari photo
लातूर

Manoj Jarange Patil | उपमुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाचा तळतळाट घ्यायला नको होता : जरांगे

मुख्यमंत्री फडणवीस डायरेक्ट गोळ्या घालतात : जरांगे यांचे आ. सत्तार यांच्‍या भेटी दरम्‍यान टीकास्‍त्र

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍यावर मराठा समाजाचा खूप विश्वास होता. समाजाने त्यांना खूप जीव लावला. त्‍यांनी मराठा समाजाचा तळतळाट घ्यायला नको होता. मरायला मी भीत नाही, मंत्र्यांच्‍या मैत्रीपायी समाजाचं वाटोळं होऊ देणार नाही', ५८ लाख कुणबी प्रमाणपत्र व त्याचा डेटा २८ ऑगस्टच्‍या आत मिळत नाही, तोपर्यंत २९ ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भेटीदरम्यान बोलताना सांगितले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डायरेक्ट गोळ्या घालतात असे सांगत त्‍यांच्‍यावर टीकास्‍त्र डागले.

या वेळी पुढे बोलताना जरांगे म्हणाले की,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाशी दगा करून कधीच जिंकू शकत नाही, शिंदे यांनी मंत्री संजय सिरसाट, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून आमचं वाटोळे केले आहे. मंत्री शिरसाट हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपेक्षा मोठे आहे का असा प्रश्न त्‍यांनी आमदार अब्दुल सत्तार यांना विचारला.

सरकारने समाजाचं वाटोळं केलं, आता उपोषण करणारच. आम्ही मुंबईत येणार, आम्ही म्हणतो फडणवीस साहेब आमचे, मग तुम्हाला आम्हाला वर्षा बंगल्यावर बसू द्यायला काय हरकत आहे? आम्ही खोलीत बसत नाहीत, बंगल्यावर बसू , आम्ही वर्षावर आंदोलन करण्यावर ठाम असल्‍याचे जरांगे यांनी सांगितले.

यावेळी आ. सत्तार यांनी सरकारच्या काही चुका झाल्‍या तर दुरुस्त करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील. परंतु तुम्‍ही मुंबईला जाऊ नये, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, अशी विनंती केली. त्यावर जरांगे म्हणाले मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईला जाणार, मराठा समाज जिद्दीला पेटला आहे. आता मागे हटणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

फडणवीस हे तर डायरेक्ट गोळ्या घालतात!

सरकार आणि मराठा समाजात संघर्ष होऊ नये, हा आमचा प्रयत्न व विनंती आहे असे आ. सत्तार यांनी सांगतातच यावर जरांगे आक्रमक होत म्हणाले, "काय सांगावं, संघर्ष करतात का काय ते? तुमचे सरकार डायरेक्ट गोळ्या घालते.! आता तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जोडीला आहे, दोघे मिळून पहिल्यापेक्षा जास्त कुटतील , मारतील असे सांगत जरांगे यांनी सरकारवर तोफ डागली. त्‍यावर आ. अब्दुल सत्तार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्‍न केला.

जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्‍न केला : आ. सत्तार

जरांगे यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या २९ ऑगस्टपासून जरांगे आमरण उपोषण करत आहेत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे मला उपोषणाची वेळ आली असल्याचे जरांगे यांचे म्‍हणणे आहे. मात्र प्रमाणपत्र रद्द करण्यात एकनाथ शिंदे यांचा काहीही संबंध नसल्याचं सत्तार यांनी सांगत मराठा समाजाच्‍या मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार करत असून चर्चेतून मार्ग निघेल असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. यावेळी त्‍यांनी मी येथे मित्र म्हणून आलो आहे. शासन मराठा आरक्षणावर नक्कीच सकारात्मक मार्ग काढेल," असे स्पष्ट केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT