लातूर : एमपीएससी परीक्षा सीबीटी (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) पद्धतीने घेण्याचा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन व ओएमआर पद्धतीनेच परीक्षा घ्यावी, या प्रमुख मागणीसाठी लातुरातील हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि.१०) भर दुपारी कडक उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत आपल्या भावनांना वाट करून दिली.
लातूर जिल्हा विद्यार्थी समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून झाली. हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी हातात फलक घेऊन जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. एमपीएससी परीक्षा ऑफलाईनच घ्या, सीबीटी पद्धत रद्द करा, टीईटी परीक्षा ओएमआर पद्धतीने घ्या, पोलिस भरतीसाठी वयोमर्यादा वाढवा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात ऑनलाईन परीक्षा पद्धतीमुळे ग्रामीण भागातील तसेच सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी, नेटवर्क समस्या, परीक्षा केंद्रांवरील तांत्रिक बिघाड आणि पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे एमपीएससीसह टीईटी परीक्षा ऑफलाईन व ओएमआर पद्धतीनेच घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
मोर्चादरम्यान लातूरमध्ये तीव्र उन्ह होते. उन्हाचा विचार करत बसलो तर आमच्या आयुष्याचाच उन्हाळा होईल. आमच्या भविष्याचा प्रश्न असल्याने हा लढा सुरू असल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही विद्यार्थी कृती समितीने निवेदनातून दिला आहे.