Latur Earthquake 1993 : भूकंपाची 32 वर्षे, समस्या कायम File Photo
लातूर

Latur Earthquake 1993 : भूकंपाची 32 वर्षे, समस्या कायम; प्रशासनाने ठोस निर्णय घेणे गरजेचे

धाराशिव जिल्ह्यातील लोहारा-उमरगा तालुक्यातील अनेक गावे भूकंपाने अक्षरशः उध्वस्त झाली होती. तो दिवस होता ३० सप्टेंबर १९९३.

पुढारी वृत्तसेवा

Latur Earthquake 1993 : 32 years after the earthquake, the problem remains

लोहारा : कालिदास गोरे

धाराशिव जिल्ह्यातील लोहारा-उमरगा तालुक्यातील अनेक गावे भूकंपाने अक्षरशः उध्वस्त झाली होती. तो दिवस होता ३० सप्टेंबर १९९३. आज या विनाशकारी भूकंपाला ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु आजही त्या वेदना जशाच्या तश्याच आहेत. गणपती विसर्जन झाल्यानंतर गावे गाढ झोपी गेली होती. आणि सर्वजण साखर झोपेत असताना पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी भूकंपाचे हादरे बसले. काहीच वेळात होत्याचं नव्हतं झालं. गावेच्या गावे जमीनदोस्त झाली. आणि हजारो लोकं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली गेली. हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले.

या भूकंपाचं केंद्र होते लातूर जिल्ह्यातील किल्लारी गाव. ६.२ रिश्टर स्केलच्या या भूकंपाने जवळपास १० हजार लोकांनी आपला जीव गमावला. तर हजारो लोक जखमी झाले. १५ हजार पेक्षा जास्त जनावरं मृत्यूमुखी पडली. तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ५२ गावे अक्षरशः मोडून पडली. हजारो घरे जमीनदोस्त झाली. तर लाखो घरांना तडे गेले. लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि धाराशिवमधील लोहारा-उमरगा तालुक्याला या भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला.

घरं, माणसं, जनावरं सर्व काही गमावल्याने आर्त किंकाळ्या ह्रदय पिळवटून टाकत होत्या. आजूबाजूच्या परिसरातील लोकांच्या डोळ्याचं पाणी थांबतच नव्हतं. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्या घरातल्याना लोक शोधत होते. अशा गंभीर वातावरणात मदतीचा ओघ सुरू होत होता, पण हानी एवढी मोठी होती की, सर्व यंत्रणा कमी पडत होत्या. देश, विदेशातून मदत सुरू झाली. तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी महत्वाची भूमिका निभावली. गावांचे पुनर्वसन करण्यात आले. पण मानसिक पुनर्वसन आजही होऊ शकले नाही. हे दुर्दैव. त्यामुळे प्रशासनाने खास बाब म्हणून या भागातील सर्व अडचणी सोडविण्यासाठी ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. या भूकंपाला आज ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण भूकंपाची जखम आजही भळभळत आहे. आजही या भूकंपाची आठवण आली की, अंगावर शहारा येतो.

हा भूकंपग्रस्त भाग दुष्काळी असल्यामुळे येथील शेती हे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे भूकंपानंतर येथे विविध उद्योग आणून या भागातील उत्पनाची साधने उपलब्ध करणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. भूकंप झाल्यानंतर घरे बांधल्यानंतर सरकार, सेवाभावी संस्था यांनी काढता पाय घेतला. मानसिक व आर्थिक पुनर्वसन करणे कोणालाही जमले नाही. आज या भागातील सरासरी २० टक्के लोक पुणे, मुंबई सारख्या शहरात कामासाठी आहेत. भूकंपात सर्वस्व गमावल्यानंतरही यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणे शक्य झाले नाही. भूकंपानंतर एवढ्या सेवाभावी संस्था आल्या होत्या. त्यांच्याकडून या भागाला नंदनवन करता आले असते पण तसा प्रयत्न कोणाकडूनही झाला नाही. परिणामी सर्वस्व गमावूनही भाकरीसाठी झगडणे कायम आहे.

या भागात अनेक समस्या आजही आहेत. भूकंपानंतर जुन्या गावातील लोक नवीन जागेत स्थलांतरित झाले. ज्या गावात नुकसान झाले परंतु पुनर्वसन झाले नाही त्या गावाची अवस्था आजही गंभीर आहे. पुनर्वसन करून न दिलेल्या गावात सतरा हजार एवढी तुटपुंजी मदत दिली गेली. त्यावर स्वतः तेथील गावकऱ्यांनी घरे बांधली. त्यावेळी नवीन जागा खरेदी केली. परंतु यावेळी प्रचंड अडचणी असल्याने जागा मालकाने शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर संमती दिली.

ग्रामपंचायतनीही 8 अ वर नोंद केली. परंतु सातबारा उताऱ्यावर नवीन जागा मालकाचे नाव नसल्याने त्या जागेची गुंठेवारी, अकृषी होत नाही. किंवा त्याची खरेदी विक्री होत नाही आणि त्यावर कोणतीही कर्ज, योजना घेता येत नाही. त्यामुळे जुन्या मालकाच्या नावे सातबारावर या जागा आहेत. त्या जागा ८ अ प्रमाणे अकृषी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३२ वर्षानंतर सुद्धा काहीही केले नाही. त्यामुळे हा प्रश्न वरचेवर गंभीर होत आहे. या बाबत अनेक निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून सुद्धा आजपर्यंत काहीही झाले नाही. त्यामुळे भूकंपग्रस्तांचे हाल आजही सुरूच आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT