लातूर : गेल्या पंधरा वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या किल्लारी येथील निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्यातून पुन्हा एकदा गोड साखर बाहेर पडू लागली असून, या साखरेसोबतच शेतकऱ्यांच्या जीवनातही गोडवा निर्माण झाला आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि सहकारावर ठेवलेल्या ठाम विश्वासामुळे बंद, विक्रीस काढलेला आणि “पुन्हा सुरू होणार नाही” असा शिक्का बसलेला हा कारखाना आज पुन्हा कार्यरत झाला आहे. कारखाना सुरू झाल्याने या भागातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, स्थानिक उद्योगांना चालना मिळाली आहे तसेच रोजगारनिर्मितीला नवी दिशा प्राप्त झाली आहे.
किल्लारी येथील निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सोमवारी सकाळी निळकंठेश्वराच्या आशीर्वादाने 50 हजार मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण करून एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद टप्पा पार केला. हा टप्पा म्हणजे केवळ गाळपाचा आकडा नसून, सहकाराच्या ताकदीवर विश्वास ठेवणाऱ्या शेतकरी बांधवांची जिद्द, त्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम आणि सामूहिक प्रयत्नांचे हे जिवंत प्रतीक आहे.
पंधरा वर्षे धूळ खात पडलेला हा कारखाना पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने उभा राहताना दिसत आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे, ठाम निर्णयक्षमतेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कारखान्याला नवे जीवन लाभले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशा, आत्मविश्वास आणि भविष्यातील सुरक्षिततेचे तेज स्पष्टपणे दिसून येत आहे.या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व सभासद शेतकरी बांधव, कारखान्याचे अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि संबंधित सर्व घटकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रत्येकाच्या मेहनतीतून, समर्पणातून आणि सहकाराच्या भावनेतूनच आज हा कारखाना पुन्हा उभा राहून प्रगतीच्या मार्गावर ठामपणे वाटचाल करत आहे.या निमित्ताने आमदार अभिमन्यू पवार यांनी समस्त शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा आश्वस्त केले आहे की, निळकंठेश्वराचे आशीर्वाद आणि शेतकरी बांधवांचे भक्कम पाठबळ यांच्या जोरावर किल्लारी निळकंठेश्वर साखर कारखान्याचा संपूर्ण कायापालट केल्याशिवाय ही वाटचाल थांबणार नाही. हा केवळ प्रारंभ असून, येणाऱ्या काळात हा कारखाना सहकार क्षेत्रातील एक आदर्श आणि प्रेरणादायी मॉडेल म्हणून नावारूपाला येईल, असा दृढ विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
किल्लारी येथील निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेले आर्थिक व प्रशासकीय प्रयत्न निर्णायक ठरले आहेत. अनेक वर्षे बंद असलेला हा कारखाना पुन्हा सुरू करणे हे मोठे आव्हान होते; मात्र केंद्र व राज्य सरकारच्या भक्कम सहकार्यामुळे हे शक्य झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक पाठबळामुळे कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक निधी आणि मान्यता मिळाली. या समन्वयातूनच किल्लारी कारखान्याला नवे जीवन मिळाले असून शेतकरी, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे.
किल्लारी येथील निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने 50 हजार मे. टन गाळपाचा टप्पा पूर्ण करणे हा माझ्यासाठी आणि समस्त शेतकरी बांधवांसाठी अभिमानाचा क्षण आहे. पंधरा वर्षे बंद असलेला कारखाना सहकाराच्या माध्यमातून पुन्हा सुरू करणे हे मोठे आव्हान होते; मात्र शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे आणि निळकंठेश्वराच्या कृपाशीर्वादामुळे हे शक्य झाले. हा कारखाना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याचा आधार बनेल. रोजगारनिर्मिती, उद्योगवाढ आणि पारदर्शक कारभारातून किल्लारी कारखान्याचा संपूर्ण कायापालट करण्याचा माझा निर्धार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही वाटचाल अखंड सुरू राहील.आमदार अभिमन्यू पवार