जळकोट : राज्य परिवहन मंडळाचे बस आगार जळकोट येथे मंजूर करावे अशी जुनी मागणी असून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. यासाठी विविध आंदोलने पण करण्यात आली आहेत. तालुक्यातील प्रवाशांची गरज लक्षात आल्याने राज्य परिवहन महामंडळाकडून आगार निर्मितीच्या हालचालींना वेग आला आहे. मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथील महाव्यवस्थापकांनी यासाठीचा अहवाल मागविला असल्याने पुन्हा एकदा तालुक्यातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
जळकोट तालुका निर्मितीपासूनच येथे बस आगार मंजूर करावे अशी मागणी आहे. तालुका विकास परिषदेकडून यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते. माजी मंत्री आमदार संजय बनसोडे व जिल्हा परिषद सदस्य धर्मपाल देवशेट्टे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे विशेष पाठपुरावा केला होता. त्याला अनुसरून राज्य परिवहन महामंडळाचे मुंबई येथील महाव्यवस्थापक यांनी वाहतूक प्रश्नावलीसह तत्काळ स्वयंस्पष्ट अहवाल सादर करावा, असे पत्र प्रादेशिक व्यवस्थापक, राज्य परिवहन महामंडळ छत्रपती संभाजीनगर व विभाग नियंत्रक, लातूर यांच्याकडे पाठवले आहे.
आता जळकोट येथे बस आगार मंजुरीच्या हालचालींना जोरदार वेग आला आहे. जर जळकोट येथे बस आगाराची आवश्यकता असेल तर नियोजन व पणन खात्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. तालुका विकास परिषदेला या पत्राची प्रत देण्यात आली असून त्यात असे नमूद करण्यात आले आहे. तालुका विकास परिषदेने यासाठी वेळोवेळी अर्ज विनंती केल्या होत्या. उपोषणेही केली होती.
याची दखल घेऊन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, जिल्हा परिषदे सदस्य धर्मपाल देवशेट्टे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. विकास परिषदेचे अध्यक्ष संग्राम कदम, राजकुमार धुळशेट्टे, आदिनाथ सिद्धेश्वरे, रामलिंग वाडकर, संतोष डुमणे यांनी चक्क आमरण उपोषण सुरू केले होते. तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी, विविध संघटना आणि पत्रकार संघ यांनीही ही मागणी लावून धरली होती. त्याची दखल आता राज्य शासनाने व परिवहन खात्याने घेतली आहे.
त्यामुळे आता जळकोटकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जळकोटला बस आगार मंजूर झाले तर तालुक्यातील 47 गावे, वाडी, तांड्यावर राज्य परिवहन मंडळाच्या बस वाहतुकीची व्यवस्था होणार आहे. लोकांची पायपीट थांबणार आहे. व्यापार उद्योग वाढणार आहे. लोकांना खाजगी वाहनाऐवजी परिवहन महामंडळाच्या बसने जा ये करणे सोपे होणार आहे. या हालचालीबद्दल तालुक्यातून आनंद व्यक्त होत आहे.