लातूर : हेल्मेटचा वापर जीव वाचवू शकतो, याचे प्रत्यंतर रेणापूर येथे घडलेल्या अपघातातून पुन्हा एकदा आले आहे. रेणापूर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस हवालदार विश्वास जाधव यांचा अपघात झाला असतानाही त्यांनी हेल्मेट घातलेले असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
माहितीनुसार, पोलीस हवालदार विश्वास जाधव हे गुरुवारी (दि. १२ जून) रात्री नियमित कर्तव्य पार पाडून रेणापूरहून लातूरकडे आपल्या दुचाकीने जात होते. रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या टाटा इंडिका कारने जोरदार धडक दिली. या धडकेत ते रस्त्यावर पडून किरकोळ जखमी झाले.अपघातात त्यांच्या कोपराला किरकोळ दुखापत झाली.
मात्र त्यांनी हेल्मेट परिधान केलेले असल्याने डोक्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि ते या जीवघेण्या अपघातातून सुखरूप बचावले. त्यामुळे हेल्मेटच्या वापराचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर अनिवार्यपणे करावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. हेल्मेट न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.