लातूर : जिल्ह्यासाठी सन 2026-27 करिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत 383 कोटी 31 लाख रुपये, जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती घटक कार्यक्रम) अंतर्गत 125 कोटी रुपये आणि जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना) अंतर्गत 3 कोटी 23 लाख रुपये अशा एकूण 511 कोटी 54 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
दरम्यान जिल्हा वार्षिक योजनेतून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली कामे विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी नियोजनबद्ध काम करावे. कोणत्याही स्थितीत निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेश पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बुधवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आमदार विक्रम काळे, आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. जिल्हा विकास आराखड्यासाठी 25 टक्के निधी प्रस्तावित केला असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात कृषी व संलग्न सेवा, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील विविध कामांवर भर देण्यात येणार आहे.
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले रस्ते, अंगणवाडी, शाळा दुरुस्तीसह जिल्ह्यास आवश्यक ग्रामविकास, वने, पशुसंवर्धन, ऊर्जा विकास, वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य, लघु पाटबंधारे, सामान्य शिक्षण, नगर विकास पर्यटन, यात्रास्थळ आदी क्षेत्रांच्या विकासासाठी शासन स्तरावर 216 कोटी 69 लाख रुपयांची वाढीव मागणी राज्यस्तरीय बैठकीत करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
लातूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्व. विलासराव देशमुख मार्ग आणि बाह्यवळण रस्त्याच्या कामाला गती द्यावी. छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकाच्या धर्तीवर लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्ते, उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी प्रारूप आराखडा तयार करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामासाठी अतिरिक्त निधीचा प्रस्ताव, तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मारकाचा प्रस्ताव महानगरपालिकेने तातडीने शासनाला सादर करावा. बाह्यवळण रस्त्याच्या 8 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही गतीने करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
रस्ते, सिंचन प्रकल्प दुरुस्तीसाठी निधी द्यावा : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
अहमदपूर, चाकूर तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. तीर्थवाडी ते चाकूर रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात यावे, या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करून दिल्यास नागरिकांची गैरसोय दूर होईल. तालुक्यातील विविध ठिकाणी वीज उपकेंद्रांची कामे मंजूर आहेत. मात्र, अनेक कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा होत नसल्याची बाब सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी मांडली.