Chaos in the farm loan waiver scheme?
देवणी, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे समोर येत आहे. काही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्षात कर्जमाफीची मंजूर रक्कम 1 लाख 60 हजार असताना ऑनलाइन पोर्टल किंवा संबंधित नोंदींमध्ये केवळ 72 हजार इतकीच रक्कम दाखवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम, निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांनी बँका, महा-ई-सेवा केंद्रे आणि संबंधित कार्यालयांमध्ये वारंवार चौकशी करूनही स्पष्ट उत्तर मिळत नसल्याची तक्रार केली आहे. काही ठिकाणी ही तांत्रिक त्रुटी असल्याचे सांगितले जात आहे, तर काही ठिकाणी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमकी माफ झालेली रक्कम किती, पोर्टलवर कमी रक्कम का दिसत आहे आणि उर्वरित रकमेचे काय होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
यंदा दुष्काळ, अपुरा पाऊस आणि पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कर्जमाफीच्या आकडेवारीत दिसणाऱ्या तफावतीमुळे त्यांची चिंता आणखी वाढली आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने या प्रकरणाची चौकशी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
शासनाने जिल्हा प्रशासन, सहकारी बँका आणि संबंधित विभागांना त्वरित सूचना देऊन सर्व लाभार्थ्यांच्या कर्जमाफीची पडताळणी करावी, पोर्टलवरील त्रुटी तातडीने दूर कराव्यात आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मंजूर कर्जमाफीची स्पष्ट माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांसह सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी केवळ आर्थिक मदत नसून संकटातून बाहेर पडण्याचा आधार आहे. त्यामुळे या योजनेत पारदर्शकता राखून कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची शास..... तातडीने दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.